भारतानं बदला घेतला, लंकेला लोळवलं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं दणदणीत विजय मिळवला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 13, 2017, 07:32 PM IST
भारतानं बदला घेतला, लंकेला लोळवलं title=

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं ठेवलेल्या ३९२ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये २५१/८ एवढेच रन्स बनवता आले. भारताकडून युझुवेंद्र चहलनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहला २ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. वॉशिंग्टन सुंदरची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिलीच मॅच आहे. श्रीलंकेच्या अँजेला मॅथ्यूजनं सर्वाधिक नाबाद १११ रन्स बनवल्या.

टॉस जिंकून या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण रोहित शर्माच्या द्विशतकामुळे भारतानं ५० ओव्हरमध्ये ३९२ रन्स बनवल्या. रोहित शर्मानं १५३ बॉल्समध्ये नाबाद २०८ रन्स केल्या. रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे तिसरं द्विशतक आहे. तर शिखर धवननं ६८ आणि श्रेयस अय्यरनं ८८ रन्स केल्या.

धर्मशालामध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा दारुण पराभव झाला होता. यानंतर मोहालीत झालेल्या मॅचमध्ये भारतानं जोरदार कमबॅक केलं आहे. ३ मॅचची सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या मॅचसाठीचा रोमांच आणखी वाढला आहे.