IND vs SL: भारतीय संघाच्या नावे नकोसा रेकॉर्ड! 45 वर्षात कधीच असं झालेलं नाही; गंभीरच्या कारकिर्दीत काळा दिवस

India vs Sri Lanka: भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवीस सामन्यात श्रीलंकेकडून (Sri Lanka)लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताने 0-2 ने ही मालिका गमावली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2024, 12:27 PM IST
IND vs SL: भारतीय संघाच्या नावे नकोसा रेकॉर्ड! 45 वर्षात कधीच असं झालेलं नाही; गंभीरच्या कारकिर्दीत काळा दिवस title=

India vs Sri Lanka ODI Series: भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिकेत 0-2 ने लाजिरवाणा पराभव झाला आहे. एकदिवसीय मालिकेत फलंदाज आणि गोलंदाज दोघेही पूर्णपणे अपयशी ठरले. भारतीय क्रिकेट संघाने दुसरा एकदिवसीय सामना 32 आणि तिसरा एकदिवसीय सामना 110 धावांनी गमावला. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. दरम्यान तिसरा सामना गमावताच भारताच्या नावे नकोसा रेकॉर्ड जमा झाला आहे. गेल्या 45 वर्षात भारतीय संघासमोर कधीच अशी स्थिती निर्माण झाली नव्हती. 

2024 मध्ये भारतीय संघ एकही एकदिवसीय सामना जिंकू शकलेला नाही

टीम इंडियाने 2024 मध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि भारतीय संघाला एकही  सामना जिंकता आलेला नाही. श्रीलंका मालिकेनंतर 2024 मध्ये भारतीय संघ एकही एकदिवसीय सामना खेळणार नाही आहे. त्तबल 45 वर्षांनंतर असं झआलं आहे की, भारतीय संघ एका वर्षात एकही एकदिवसीय सामना जिंकू शकलेली नाही. याआधी, 1979 मध्ये असं घडलं होतं, जेव्हा टीम इंडिया एकही वनडे सामना जिंकू शकली नव्हती. भारतीय संघाने 1974, 1976 आणि 1979 मध्ये एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. Cricbuzz ने दिलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ आता 2024 मध्ये डिसेंबरपर्यंत फक्त कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

श्रीलंकेविरोधात 27 वर्षांनी मालिका गमावण्याची वेळ

भारतीय संघाने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्धची मालिका गमावली आहे. यापूर्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका गमावली होती. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि रोहित शर्मा यांनी भारतीय कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली आहे.

फलंदाजांची सुमार कामगिरी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एकूण 248 धावा केल्या. पण फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ फक्त 138 धावांपर्यंतच मजल मारु शकता. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 35 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने अनेक फटके मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने 30 धावा केल्या. विराट कोहलीने 20 आणि रायन परागने 15 धावा केल्या. या खेळाडूंशिवाय भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.