ज्याची बॅट, त्याची बॅटिंग! लहानपणी आऊट होताच बॅट घेऊन पळून जायचा, हा स्टार कॅप्टन

टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  

Updated: Sep 30, 2021, 06:26 PM IST
ज्याची बॅट, त्याची बॅटिंग! लहानपणी आऊट होताच बॅट घेऊन पळून जायचा, हा स्टार कॅप्टन title=

मुंबई : भारतात क्रिकेट माहिती नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने क्रिकेट खेळलं नसलं तरी त्याबद्दल ऐकलेलं किंवा पाहिलेलं असतंच. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने लहानपणी 'गल्ली क्रिकेट' खेळलं असेल. प्रत्येकाच्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी असतात. आपल्यापैकी अनेकांनी कपडे धुण्याच्या धुपाटण्याचा बॅट म्हणून वापर केला असेलच. तसेच गली क्रिकेटमध्ये स्टंप म्हणून मोठा दगड किंवा एखादी लाकडी फलीचा वापर केला जातो. स्टार क्रिकेटपटूंच्याही लहानपणीच्या काही आठवणी आहेत. (Team India star batsman and captain of Delhi Capitals Rishabh Pant shared his childhood memory of street cricket)

याच लहानपणीच्या आठवणींना टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार रिषभ पंतने उजाळा दिला आहे. 

पंत काय म्हणाला? 

"मी माझ्या मूळ गावी रुडकी इथे क्रिकेट खेळायचो. माझ्या घरासमोर मोठं मैदान होतं. तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. त्या मैदानासमोर नेहमीच बांधकाम सुरु असायचं. तिथून आम्ही विटा उचलून आणायचो. आम्ही त्या विटांचा स्टंप म्हणून करायचो", अशी गोड आठवण रिषभ पंतने सांगितली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने ट्विटर हँडलवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत रिषभ पंतने ही आठवण सांगितली.  

"आऊट झाल्यावर पळून जायचो" 

आपल्याकडे गल्ली क्रिकेटचे काही अलिखित नियम आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे ज्याची बॅट त्याचीच बॅटिंग. रिषभ पंतकडे बॅट होती. त्यामुळे तोच आधी बॅटिंग करायचा. "माझी बॅट असल्याने मी बॅटिंग करायचो. आऊट झाल्यानंतर मी पळून जायचो", असा मजेशीर किस्सा पंतने या व्हीडिओत सांगितला.