Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

टू व्हिलर (Two wheeler) घेण्याचा तुम्ही विचार करत असला तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी.  

Updated: Dec 24, 2020, 10:31 AM IST
Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार  title=

मुंबई : टू व्हिलर (Two wheeler) घेण्याचा तुम्ही विचार करत असला तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. आताच दुचाकी घ्या, अन्यथा नवीन वर्षात या गाड्या महागण्याचे संकेत मिळत आहेत. देशातील कार उत्पादकांनी (Car manufacturer) गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कार महागणार आहेत. आता टू व्हिलरही (Two wheeler) महागण्याचे संकेत कंपन्यांकडून देण्यात आले आहेत. 

देशातील सर्वात मोठी टू व्हिलर उत्पादक असलेली कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp Bikes )त्यांच्या दुचाकींच्या किंमतीत दीड हजार रुपयांनी वाढ करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हिरो मोटोकॉर्प कंपनीने म्हटले आहे की, देशात स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लॅस्टिक आणि  टू व्हिलरसाठी आवश्यक इतर धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकींच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. याचा भार कंपनीवर पडत आहे. परिणामी, उत्पादनातील वाढता खर्च भरून काढण्यासाठी काही प्रमाणात दरवाढ करावी लागणार आहे. त्यामुळे दुचाकीच्या किमतीत वाढ होणार आहे.

दरम्यान, कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याचे स्पष्ट केले आहे. नवीन वर्षात दरवाढ करणार्‍या कार निर्मात्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, फोर्ड आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे. धातू आणि उत्पादन खर्च वाढल्या असल्याचे गाड्यांच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

होंडाचा कार प्रकल्प बंद?

होंडा कार्स इंडिया लिमिटेडने उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातील कार उत्पादन करणारा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरवर्षी तब्बल एक लाख कारचे उत्पादन करणार्‍या या प्रकल्पात होंडा सिटी सिव्हिक आणि सीआर-व्ही यांसारख्या महागड्या कराची निर्मिती केली जात होती. मात्र, प्रकल्प बंद होत असल्याने येथे कारचे उत्पादन होणार नाही.

दरम्यान, कंपनीने याबाबत कोणतीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यासंदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील हा कार उत्पादन प्रकल्प १९९७ मध्ये १५० एकर जागेवर उभारण्यात आला आहे. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे आणि खर्चामुळे हा प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या कारखान्यातील उत्पादन डिसेंबरपासून बंद आहे. सध्या येथील सर्व काम कंपनीने राजस्थानच्या अलवर येथील तपुकारामध्ये होणार आहे.