पोलिसांच्या कुटुंबीयांचा गिरीश बापटांच्या घरावर धडक मोर्चा

पोलीस वसाहतीतील पाण्याचा समस्या खूप जुनी आहे.

Updated: Oct 14, 2018, 01:41 PM IST
पोलिसांच्या कुटुंबीयांचा गिरीश बापटांच्या घरावर धडक मोर्चा title=

पुणे: पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी पाण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला. शिवाजीनगर पोलीस वसाहतीत गेल्या चार दिवसांपासून पाणी नाही. घरात पाणी नसल्याने येथे राहणाऱ्या कुटुंबाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत संतप्त महिलांनी थेट पालकमंत्र्याच्या घरावर हंडा मोर्चा काढला. 

नळाला पाणी नसताना किमान टॅंकर तरी पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून त्यांचं समाधान झालं नाही. तेव्हा त्यांनी मॉडर्न महाविद्यालय रस्त्यावर पोलीस वसाहतीसमोर आंदोलन सुरु केले. पोलीस वसाहतीतील पाण्याचा समस्या खूप जुनी आहे. पुरेसा पाणीपुरवठा न होणे ही इथली नित्याचीच बाब आहे. अशा परिस्थितीत पोलीसांच्या कुटुंबीयांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी बापट यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले़ त्यानंतर महिला व इतर नागरिक घरी गेले.