पाकिस्तानचा भारताला गुपचूप संपर्क, भारताने सुनावलं

पाकिस्तानला भारताने सुनावलं

Updated: Sep 6, 2018, 02:01 PM IST
पाकिस्तानचा भारताला गुपचूप संपर्क, भारताने सुनावलं title=

नवी दिल्ली : अमेरिकेतील एका वृत्तपत्रात छापलेल्या बातमीनुसार पाकिस्तानच्या लष्कराने भारतासोबत चर्चेसाठी गुपचूप पद्धतीने भारताला संपर्क केला होता. पण भारताने त्याला प्रतिसाद दिला नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार पाकिस्तानातील निवडणुकीआधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताला संपर्क केल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या लष्कराकडून शांती प्रस्ताव आल्यानंतर भारतीय लष्करचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं की, पाकिस्तानला जर भारतासोबत चर्चा करायची असेल तर त्यांनी आधी आपल्या देशातील दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.'

त्यांनी म्हटलं की, जर पाकिस्तान दहशतवाद थांबवतो तर आम्ही देखील नीरज चोपडा बनू. काही दिवसांपूर्वीच आशियाई स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने जेवलिन थ्रोमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर पाकिस्तानला कास्य पदक मिळालं होतं. चोपडाने तेव्हा खेळ भावना दाखवत पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हात मिळवला होता.

नीरज चोपडा मागील वर्षी जूनियर ऑफिसर म्हणून सैन्यात भरती झाला होता. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर कास्य पदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूला हात मिळवल्याचा फोटो टेनिसपटू सानिया मिर्जाने देखील शेअर केला होता आणि त्याचं कौतूक केलं होतं.