''आम्हाला मारुन टाकण्याआधी आम्हाला वाचवा'', अफगाण नागरिकांचा पाकिस्तानलाही गर्भित इशारा

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी हैदोस मांडलाय. अनेक महत्त्वांच्या शहरांवर त्यांनी दहशतीच्या जोरावर ताबा मिळवलाय. नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आलीये. 

Updated: Aug 13, 2021, 05:17 PM IST
''आम्हाला मारुन टाकण्याआधी आम्हाला वाचवा'', अफगाण नागरिकांचा पाकिस्तानलाही गर्भित इशारा  title=

काबूल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी हैदोस मांडलाय. अनेक महत्त्वांच्या शहरांवर त्यांनी दहशतीच्या जोरावर ताबा मिळवलाय. आता हे तालिबानी राजधानी काबूलवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने पुढे जात आहेत. काबूल सध्या सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं जातंय. अफगाणिस्तानातील अनेक नागरिक हे आपला जीव वाचवण्यासाठी काबूलकडे धाव घेत आहेत. पण तालिबानी ज्या वेगाने पुढे जातायेत, त्या वेगाने तालिबानी 90 दिवसांच्या आत काबुलवरही ताबा मिळवतील. देशातील वेगवेगळ्या भागात सेना आणि सुरक्षा यंत्रणेत हल्ले सुरु आहेत, या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना नाहक जीव गमवावा लागलाय. अफगाणिस्तानात नक्क काय घडतंय, याबाबतचा खुलासा हा काबूल यूनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असलेल्या इत्तेहाशम (काल्पनिक नाव) यांनी केला आहे. (Save the blood of Afghans we live in jail, says Afghan professor on Taliban terror)
 
प्राध्यापक काय म्हणाले? 

देशावरचं संकट  वाढतच चाललंय. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी काबूलच्या दिशेने येतोय. परिस्थिती इतकी बिकट झालीये, की अनेकांवर कुटुंबियांसोबत बागेत झोपण्याची वेळ ओढावलीये. कोणावर कधी आणि कुठून हल्ला होईल, याबाबत काहीही सांगता येत नाही. प्रत्येकामध्ये दहशतीचं वातावरण आहे. "आम्ही आता परत शहरात जाऊ शकत नाही, कारण तिथे धोका अधिक आहे. अनेक नागरिक हे या वाईट परिस्थितीतही गैरफायदा घेत आहेत. प्रत्येक वस्तूचे दर हे दुप्पट झाले आहेत. जिथे जाण्याचे आधी 600 रुपये लागायचे, तिथे जाण्यासाठी आता थेट 2 हजार रुपये द्यावे लागतायेत. यावर सरकारचंही नियंत्रण नाहीये. यामुळे गॅस, पेट्रोलसह अन्य वस्तूंचे भाव वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तूचे दरही वाढतायेत" असं या प्राध्यपकांनी मित्राचं उदाहरण देऊन स्पष्ट केलं.    

शरणार्थिंना लोकांकडून मदत

प्राध्यापकांनी दिलेल्या उदाहरणात, "मी आज माझ्या मित्रासोबत बोललो. तो बल्ख वरुन काबूलला आला. त्याने मला सांगितलं की आधी प्रवासासाठी 600 रुपये द्यावे लागायचे तर आता तेवढ्याच अंतरासाठी 2 हजार रुपये मोजावे लागतायेत. अनेकांकडे खाण्यापिण्यासाठी काहीच नाही. अशांसाठी आम्ही निधी जमा करतोय. ज्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची सोय होईल", असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पाकिस्तानबाबात काय म्हणाले? 

जर अफगाणिस्तानात शांती राहिली तरच पाकिस्तानात शांतता नांदेल. अफगाणिस्तानात वाद झाला तर पाकिस्तानातही त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे पाकिस्तानने  अल कायदा, तालिबान, आयएसआयएस या आंतकवादी संघटनांना मदत करणं बंद करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं. 

दर सेंकदाला सर्वसामांन्यावर हल्ला

भारतासह जगातील सर्वांना प्राध्यापकांनी एक संदेश दिला. संदेशात म्हटलंय की, "आज आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आम्हाला आमचा जीव वाचवण्यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांचं रक्त वाहण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्या सोबतीची गरज आहे. स्थिती फारच गंभीर आहे. काही भागात तर रात्री 8 नंतर बाहेरही पडता येत नाहीये. यावरुन समजेल की आम्ही तुरुंगात राहतोय. आम्ही सर्वसामांन्यांसारखं न जगता तुरुंगात राहतो, तसं जगतोय. आम्ही मित्रांसोबत तसेच कुटुंबियांसोबत  घराबाहेर पडू शकत नाही. रात्रीच काय तर दिवसाढवळ्याही  बाहेर पडू शकत नाही. कारण येथे दर सेंकदाला प्रत्येकावर जीवघेणा हल्ला केला जातोय. त्यामुळे मी सुशिक्षित असल्याने परदेशात जाण्याची संधी सोडणार नाही", असं त्यांनी नमूद केलं.         

सुरक्षित जागी जाण्यास नकार

"यावेळी प्रत्येकजण देश सोडण्याचा विचार करत आहे. मला सर्व देशांना संदेश पाठवायचा आहे, मग त्यांनी आम्हाला पाठिंबा देवोत किंवा नाही. आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही. आम्हाला फक्त गरज आहे ती म्हणजे अफगाणिस्तान आमच्यासाठी सुरक्षित ठिकाण बनवण्याची. आपण कोणत्याही देशात जाणे योग्य नाही, आपला स्वतःचा देश सुरक्षित असावा अशी आमची इच्छा आहे" अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  
 
वेळेनुसार आम्हीही अधिक मजबूत होऊ. यासह त्यांनी अमेरिका चीन आणि इराणबाबतही प्रतिक्रिया दिली. "अमेरिका इथेच राहिली कारण त्यांना संपूर्ण आशिया नियंत्रित करायचा होता. चीन आणि इराण तालिबानशी भेटत आहेत. तो तालिबानला सांगत आहे की जर इसिस किंवा इतर कोणी चीनवर हल्ला केला तर तालिबान मदत करू शकतो. म्हणूनच इराण तालिबानचा वापर करू शकतो".