'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'

..तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी.. 

& Updated: Sep 10, 2018, 10:14 PM IST
'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..' title=

प्रवीण दाभोळकर, झी मीडिया,मुंबई :

प्रिय चिंतामणी,

काल तुझ्या आगमन सोहळ्यासाठी कुठून कुठून भाविक आले होते म्हणून सांगू?... बदलापूर, अंबरनाथ, विरार, नालासोपारा...मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली...फक्त आणि फक्त तूला पाहायला...तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी.. म्हणजे इतकी गर्दी की उभ राहणंही अशक्य आणि श्वास घेणंही कठीण...

खरंच... एवढा उत्साह फक्त तूझ्या येण्याचा असेल का रे ? यातल्या अनेकांना तर एवढा आनंद झाला की बस, टॅक्सीवर उभे राहून नाचत होते. रस्त्याच्या मधोमध लावलेला मुंबई पोलीसांचा प्रतिकात्मक स्टॅच्यू त्यांनी तोडला..खूप नासधूस केली..आगमानाच्या नावाखाली थिल्लरगिरी करणाऱ्यांनी तुझीच शपथ घेऊन सांगावं की कालच्या दिवसात तुझा चेहरा तरी पाहिला असेल का ? तू निघून गेलास ना त्या रस्त्यावरून तेव्हा मागे उरला होता तो चपलांचा ढिग, गर्दीत हरवलेल्या आपल्या जवळच्यांना शोधणाऱ्या नजरा, कसा क्लिक केला सांगणारे फोटोग्राफर्स आणि कोपऱ्यावर सिगारेटचे झुरके ओढणारे स्मोकर्स...

 तुला तर माहितेय, कोणी पाहुणा आमच्या लालबाग परळंमध्ये आला की आम्ही अभिमानाने इथला इतिहास सांगतो...याला गिरणगाव म्हणतात.... इथे गिरण्या होत्या...गिरणी कामगार होते..चाळी होत्या....लोकांना हातावर पोट होतं पण त्यातही गणेशोत्सव आनंदातला होता .त्यावेळचं वातावरण रेखाटणाऱ्या प्रल्हाद शिंदेच्या आवाजातल्या ओळी ऐकल्या तरी आजही अंगावर काटा येतो... ''नाव काढू नको तांदूळाचे, केले मोदक लाल गव्हाचे..हाल ओऴख साऱ्या घराचे.. दिन येतील का रे 'सुखाचे' ?'' 

हेच होते का रे ते 'सुखाचे दिवस' ?

बाप्पा.. दरवर्षी वेगवगळ्या नावा, रुपाने तू आमच्या घरी, मंडळात येतोस...मस्तपैकी दहा-बारा दिवस राहतोस...पोटभर खातोस..मनभर आशीर्वाद देतोस..निघून जातोस..कधीकाळी हे खूप श्रद्धेने व्हायचं पण आता तुला मंडपात आणणं हाच आम्ही एक मोठा इव्हेंट करुन टाकलायं.....

 आगमनाला किती ढोल ताशा पथकं बोलावयची या विषयापासून गणेशोत्सवातले वाद आणि स्पर्धेला सुरूवात होते. आमच्या गणपतीत सेलिब्रेटींनी आलं पाहिजे, तरच आमचा उत्सव मोठा..असं आम्हाला वाटतं रे.. आमच्या गणपतीसमोर नवस फेडणाऱ्या मोठमोठ्या रांगा लागायला हव्यात मग आम्हाला बरं वाटतं, आमचा गणपती टीव्हीवर दिसण्यासाठी आम्ही धडपडतो....हे सर्व काही तुला बर वाटाव म्हणून चाललेल असतं बरं का ?

'हा झगमगाट, मान, प्रसिद्धी खरंच तुला हवी असते का रे ?'

की आम्हीच करतो हे आमचा 'इगो' सुखावण्यासाठी ?

कधीतरी वाटतं तू यायचाच बंद होशील...कायमचा...

आमचा 'चिंतामणी'ही तूच,'विघ्नहर्ता'ही तूच, 'राजा'ही तूच आणि 'कैवारी' सर्व काही तूच...
'बाप्पा, आम्हाला माफ कर'...आम्ही आमचा इतिहास विसरलोय...आमची संस्कृती विसरलोय..आम्हाला कोणी शिकवायला गेलं की त्याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवतो आणि दुसऱ्या धर्माकडे बोट दाखवतो... आम्ही दरवर्षी आरतीनंतर म्हणतो ना 'अन्याय माझे कोट्यान कोटी..मोरेश्वरा बा तू घालं पोटी..' हे तू दरवर्षी अन्याय पोटात घेतोस आणि आम्ही पुढच्या चूका करायला मोकळे होतो...खूप सहन करतोस....पोट खूपचं वाढलंय रे तूझं...

असो...चालायचचं...

तुझेच भक्त