विद्यापीठ अंतिम परीक्षेबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची भूमिका

कुलगुरुंबरोबर झालेल्या बैठकीनंतर महत्वपूर्ण माहिती

Updated: May 25, 2020, 09:01 PM IST
विद्यापीठ अंतिम परीक्षेबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची भूमिका title=

मुंबई :  आधी कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या आणि आता राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्या वादात अडकलेल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय अंतिम परीक्षेबाबत घेतला जाईल, अशी माहिती उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील  निर्णय घेऊ, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज बैठकीनंतर सांगितले.

परीक्षेबाबत बोलताना उच्चशिक्षणमंत्री सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा, आशा सूचना  आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये  देण्यात आल्या.

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये  आणि  विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत, असाच निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले. तसेच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही, याची  दक्षता घेऊन  विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून  वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच   निर्णय घेतला जाईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे  क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.

आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे  कुलगुरू सहभागी झाले होते .