MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

MPSC परीक्षा पुढे ढकलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.

Updated: Oct 9, 2020, 10:56 PM IST
 MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा  title=

मुंबई : MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. MPSC बाबत गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरु होती. आजच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलायची की नाही याबाबत चर्चा करण्यात येत होती. सारासार विचार करुन आणि कोरोनाचे संकट असल्याने MPSC परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ११ ऑक्टोबरला ही परीक्षा होणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारला भाग पाडले गेले आहे, अशी टीका ओबीसी नेत्यांकडून करण्यात आली आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज झाली. यावेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी दोनवेळा MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

आता ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होणार होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला, त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही विरोध केला होता. परीक्षा घेऊ नका, अशी त्यांनी मागणी केली होती.  मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता.  मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असे वक्तव्य संभाजीराजे यांनी केले होते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीराजे यांनीही केली होती.