पायल घोष राज्यपालांच्या भेटीला; अनुराग कश्यपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पायलकडून सातत्यानं अनुरागच्या अटकेची मागणी केली जात असतानाच.... 

Updated: Sep 29, 2020, 07:39 PM IST
पायल घोष राज्यपालांच्या भेटीला; अनुराग कश्यपच्या अडचणी वाढण्याची शक्यता title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड Bollywood चित्रपट दिग्दर्शक anurag kashyap अनुराग कश्यप याच्या अडचणींत येत्या काळात वाढ होण्याची चिन्हं आहेत. अभिनेत्री पायल घोष हिनं अनुरागवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यानंतर आणि पोलिसांत याबाबतची रितसर तक्रार दाखल केल्यानंतर आता चौकशीसाठी मुंबई पोलिसही अनुरागला समन्स बजावण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

पायलकडून सातत्यानं अनुरागच्या अटकेची मागणी केली जात असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायलला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतून पायलला न्याय मिळावा अशी मागणी करत खुद्द आठवलेंनीही अनुराग कश्यपवर तातडीनं कारवाई करण्याचाच सूर आळवला. असं न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत अपेक्षित कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसह मंगळवारी पायल आणि रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आठवले यांनी या भेटीदरम्यानची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्याबाबतची माहिती दिली. 'महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज अभिनेत्री पायल घोषला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळासह भेट घेतली', असं लिहित त्यांनी ही छायाचित्र पोस्ट केली. 

 

दरम्यान, अनुरागवर कारवाई करण्यात यावी अशी मागण जोर धरत असतानाच तिथं अनुरागनं मात्र आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नव्हे, तर अनेक कलाकारांनी त्याची साथ देत या बॉलिवूड दिग्दर्शनाच्या समर्थनार्थ आवाज उठवल्याचं पाहायला मिळत आहे.