बाजी : शेराची वाकडी नजर हिराला करेल हैराण?

मुंबई : 'बाजी' या झी मराठीच्या नवख्या मालिकेच्या ७ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात बाजी आणि दादाजी पासून झाली. रात्रीच्या गडावरून अंधारात ताडताड चालणाऱ्या बाजीला दादाजी विचारतात, असा रागाने कुठं चाललास मर्दा भूक नाही लागली का? तेव्हा बाजी म्हणतो नाही लागली भूक. जेवायला गेलो होतो तर आईने लग्नाचे दळण दळायला घेतले व लग्न कर असे बोलण्याचा रट्टाच लावला मग कशी लागणार भूक? पण दादाजी त्याला समजावून जेवण्यासाठी घेऊन जात असतो तेवढ्यात म्हादबा ही जेवायला जात असे बाजीला कळते. त्याला अडवत डोळ्यात तेल घालून पहारा करा असे सांगतो. कारण गनिम पुण्यात घुसल्याची बातमी बाजीला कळली होती. मग दादाजीला भाकरी खाण्यासाठी जा असे बाजी म्हणताच, दादाजी बाजीला खोडकरपणे बोलतात की, बाजी तुही डोळ्यात तेल घालून पहारा कर बरं का! कारण हल्ली घुंगराच्या आवाजाने तुझाही नेम चुकायला लागलाय. असा चिमटा काढून दादाजी भाकरी खाण्यासाठी घरी जातात.

दुसरीकडे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेरा आपल्या भावाला म्हणजे लोहाला व नासीरला बावनखणीच्या बाहेर भेटतो आणि पुण्याची खबरबात घेऊन आज रात्री पुण्यावर पहिला वार करायचा आहे असे बावनखणीत प्रवेश करतो. दरम्यान चंद्राबाईच्याही मुजऱ्याचा कार्यक्रम संपलेला असतो. तेवढ्यात शेरा चंद्राबाई समोर येऊन उभा राहतो. म्हाताऱ्याचं सोंग जरी केलेले असले तरी चंद्राबाई शेराला चांगलेच ओळखते आणि भीतीने घामाघूम होते. त्यातून स्वतःला सावरत चंद्रा शेराला विचारते एवढ्या लांबून पुण्यात कसे आलात? तेव्हा शेरा म्हणतो, हिरा हवाय मला, ते ऐकून चंद्राबाईच्या काळजाचा ठोकाच चुकतो, पण लगेचच शेरा म्हणतो चिंतामणी हिरा हवाय मला आणि हिरासुद्दा हवीय. शेराचे असे धारदार बोल ऐकून चंद्राबाईचे अवसानच गळून पडते. शेराच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढे बोलून जाते की एवढे दिवस तुमच्यासाठीच तर हिराला सांभाळून ठेवली आहे. ते ऐकून सुखावलेला शेरा जोराने हसतो व तोंड दाखवणे कधी करतेस ते सांग? मला लवकरच तिला घेऊन जायचे आहे. परंतु हिरा माझ्या म्हातारपणाची काठी आहे असे सांगून चंद्राबाई शेराचे मन वळवण्याचे प्रयत्न करते पण, हिराचे सौंदर्य बघून वेडापिसा झालेला शेरा चंद्राबाईच्या बोलण्याकडे लक्ष देत न देता हिराच्याच विचारात पार बुडून जातो.

दरम्यान स्वतः हिरा त्या ठिकाणी येते आणि शेरा लगेच अंधारात आपला चेहरा लपवतो आणि सौंर्दयाने झळकणाऱ्या हिराला न्याहाळत राहतो. परंतु त्या ती अनोळखी व्यक्तीला बद्दल हिरच्या मनात मात्र हजार शंका आणि प्रश्न गोंगाट करू लागतात. तेवढ्यात शेरा हिरेजडित कर्ण कुंडल हिराला भेट म्हणून देतो आणि ते त्याच्या सामोरच घालून दाखवण्याचा आग्रह धरतो. क्रूर शेराच्या याही आज्ञेचे चंद्राबाईला व आईमुळे नाईलाजाने हिरालाही पालन करावे लागते. कर्ण कुंडल परिधान करून झाल्यावर हिरा गोंधळल्या अवस्थेत तेथून निघून जाते. हिरावर पडलेली चंद्राची नजर चुकवण्यासाठी आणि हिराला शेराच्या संकटातून वाचवण्यासाठी चंद्राबाई कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी बाजी या रोमांचकारी मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.