...तर रणवीर परतणारच नाही; दीपिकाला भलतीच खात्री

पाहा दीपिका असं म्हणाली तर काय.... 

Updated: Oct 11, 2019, 11:56 AM IST
...तर रणवीर परतणारच नाही; दीपिकाला भलतीच खात्री  title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी जोड्यांमध्ये असणारे नातेसंबंध म्हणजे चाहत्यांच्या चर्चेचा आणि तितकाच आवडीचा विषय. रिल आणि रिअल अशा दोन्ही आयुष्यात प्रकाशझोतात असणारी अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची. 

चित्रपटांतून एकत्र झळकणाऱ्या या दोघांनीही वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून विविध कार्यक्रम म्हणू नका किंवा मुलाखतींची सत्र, प्रत्येक ठिकाणी 'दीप- वीर'वरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या. अशीच एक मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपिका रणवीरविषयी अशी एक हमी देत आहे, जे पाहता या पती- पत्नीचं नात्याची एक सुरेख बाजूच पुन्हा एकदा समोर येत आहे. 

रणवीर तुझ्यासोबत कधी बॅडमिंटन स्पर्धा खेळला आहे का आणि तो जिंकला आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यावर दीपिकाचं उत्तर पाहण्याजोगं आहे. 'हा काही प्रश्न आहे का ज्याचं उत्तर मी द्यावं.. की सामना कोण जिंकलं...?', असं दीपिका खोडकरपणे हसत म्हणाली. रणवीरला आपण हरवल्याचं स्पष्ट करत किती फरकाने त्याचा पराभव झाला आहे हे सांगितलं तर सध्या हैदराबादमध्ये असणारा रणवीर परतणारच नाही, मला खात्री आहे असं ती रणवीरचे खिल्ली उडवत म्हणाली. 

दीपिका आणि रणवीरचं हे नातं आणि त्यात असणारी सहजता पाहता खरंच त्यांचा सर्वांना हेवा वाटत आहे. विविध चित्रपटांच्या बाबतीत आगामी चित्रपटांचं म्हणाल तर, दीप- वीर हे दोघंही कबीर खान दिग्दर्शित '८३`' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १९८३ मधील क्रिकेट विश्वचषकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून रणवीर हा भारतीय संघाचे माजी कर्णधार, क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, दीपिका त्यांची ऑनस्क्रीन पत्नी साकारत आहे.