अमिताभ बच्चन संपले! 1990 मध्ये कव्हर पेजवर फोटो छापणाऱ्या मॅगझीनचं पुढे काय झालं?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अग्निपथ (Agneepath) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र नंतर हा चित्रपट कल्ट झाला होता. पण 2000 मध्ये अमिताभ यांनी आपला स्टारडम पुन्हा मिळवला होता.   

शिवराज यादव | Updated: Aug 14, 2024, 05:42 PM IST
अमिताभ बच्चन संपले! 1990 मध्ये कव्हर पेजवर फोटो छापणाऱ्या मॅगझीनचं पुढे काय झालं? title=

बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. गेल्या 50 वर्षांपासून अमिताभ बच्चन बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी अमिताभ बच्चन यांच्या आतापर्यंतची कारकीर्द कशी होती याचा आढावा घेणारी एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. रामगोपाल वर्मा यांनी एक्सवर Illustrated Weekly या मॅगझीनचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या मॅगझीनने अमिताभ बच्चन आता संपले असा कव्हर फोटो छापला होता. 

रामगोपाल वर्मा यांचं ट्वीट

रामगोपाल वर्मा यांनी एक्सवर Illustrated Weekly मॅगझीनने 1990 च्या आपल्या अंकात कव्हर पेजवर छापलेला फोटो शेअर केला आहे. त्यांनी कव्हर पेजवर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला होता. याची हेडिंग त्यांनी Finished म्हणजेच संपले असं दिलं होतं. 

हा फोटो शेअर करताना रामगोपाल वर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "34 वर्षांपूर्वी ILLUSRATED WEEKLY मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर हे छापलं होतं, आणि आता हीच ILLUSRATED WEEKLY संपली आहे. सीनिअर बच्चन मात्र अजूनही आहेत".

रामगोपाल वर्मा यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केल्याने नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. याचं कारण 2011 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 'बुढ्ढा होगा तेरा बाप' चित्रपट केल्याने रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 'रामगोपाल वर्मा यांनी सकारात्मक ट्वीट करणं हे फारच दुर्मिळ आहे,' असं नेटकरी म्हणत आहेत. 

इतर नेटकऱ्यांनीही रामगोपाल वर्मा यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. एकाने लिहिलं की, 'जीवनातील शिस्त आणि समर्पण, तुम्हाला वर्षानुवर्षे उच्च स्थानावर ठेवू शकते. बच्चन हे त्याचं जिवंत उदाहरण आहे', असं एकाने म्हटलं आहे. 

1970 च्या दशकात अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध झालेल्या अमिताभ बच्चन यांना 1990 मध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर अनेकांनी आता त्यांचं करिअर संपलं अशी घोषणा केली होती. मासिकाने ज्यावर्षी ते संपले असं जाहीर केलं त्याच वर्षी त्यांचा 'अग्निपथ' रिलीज झाला होता. तेव्हा या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढच्या वर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर तर हा कल्ट चित्रपट झाला. 2012 मध्ये या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला.

सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अखेर कौन बनेगा करोडपती आणि मोहबत्ते चित्रपटाने अमिताभ यांना पुन्हा यशाची चव चाखण्याची संधी दिली. तेव्हापासून आता रिलीज झालेल्या कलकी चित्रपटापर्यंत ते सतत काम करत आहेत.