चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ; भारत-चीन मुद्द्यावर कंगनाचं आवाहन

'लडाख केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे'

Updated: Jun 28, 2020, 01:46 PM IST
चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ; भारत-चीन मुद्द्यावर कंगनाचं आवाहन title=
फोटो सौजन्य : Instagram

मुंबई : बॉलिवूड क्विन अभिनेत्री कंगना रानौतचा स्पष्टवक्तेपणा सर्वच जाणतात. प्रत्येक सामाजिक, बॉलिवूड, देशाप्रती आपले मुद्दे मांडणाऱ्या कंगनाने नेहमीच अनेक गोष्टींवर आलं मत मांडलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांद्वारे भारतीय सैनिकांवर हिंसक झडप करण्यात आल्यानंतर याबाबत निषेध करत कंगनाने सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचं आणि आपल्या सैनिकांसाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे.

कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आपल्या सैनिकांचं बलिदान विसरु नका, हा केवळ आपल्या सैनिकांवरच झालेला हल्ला नाही तर देशावर झालेला हल्ला आहे. आपल्या शूर सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्याची आणि चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत तिने जनतेला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

सीमेवर जे युद्ध होतं ते केवळ सैनिकांचं युद्ध असतं का, असा सवाल करत तिने या युद्धात आपणही चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून सहभागी होणं हे आपलं कर्तव्य असल्याचं म्हटलंय. लडाख केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग असल्याचं कंगनाने म्हटलंय.