'सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही', गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य

कायदेशीर सल्ला घेऊनच पुढचा निर्णय

Updated: Aug 1, 2020, 05:28 PM IST
'सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही', गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य title=

मुंबई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाची परवानगी देण्यात आलेली नाही, असं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत. बिहार पोलिसांचा अर्ज आत्ताच आला आहे, त्यामुळे त्यांना तपासासाठी आवश्यक कागदपत्र पुरवण्याबाबत महाराष्ट्र सरकार कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केलं आहे. 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच नाही, असंही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. बिहार पोलीस मुंबईमध्ये आले आहेत. बिहारमध्ये दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणी महाराष्ट्रात चौकशी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांना केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

सुशांतसिंग राजपूत राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवण्यासाठी सध्या बिहार पोलीस प्रयत्नशील आहेत. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला नाही, म्हणून बिहार पोलिसांनी कूपर हॉस्पिटल गाठलं. कूपर हॉस्पिटलमध्ये बिहार पोलिसांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी केली आहे. पण कूपर हॉस्पिटलनेही बिहार पोलिसांना रिपोर्ट दिला नाही.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट हवा असल्यास योग्य मार्गाने मागावा, असं कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना सांगितलं आहे. मुंबई पोलिसांकडून अथवा योग्य मार्गाने हा अहवाल घ्यावा, असं उत्तर कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे बिहार पोलिसांच्या हाती अजूनही सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. 

आज सकाळी बिहार पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. मुंबई पोलीस सहकार्य करत असल्याचंही बिहार पोलिसांनी सांगितलं. वांद्रे पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर बिहार पोलीस दिग्दर्शक रुमी जार्फीच्या घरीही गेले. 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन कालच मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईच्या रस्त्यावर मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. बिहार पोलिसांचे अधिकारी अंधेरीमध्ये पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचं होतं, पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना माध्यमांबरोबर बोलू दिलं नाही. तसंच बिहार पोलीस अधिकाऱ्यांना जबरदस्ती गाडीत घालून मुंबई पोलीस घेऊन गेले.