'कोल्हापूर असो वा सातारा छत्रपतींच्या गादीचा अवमान...', प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले 'या पातळीवर...'

त्यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 

नम्रता पाटील | Updated: Apr 12, 2024, 10:49 PM IST
'कोल्हापूर असो वा सातारा छत्रपतींच्या गादीचा अवमान...', प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले 'या पातळीवर...' title=

Shahu Maharaj Chhatrapati Insulted In Kolhapur : प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने हे कायमच बेधडकपणे वक्तव्य करताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून ते सोशल मीडियावर विशेष सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते कायमच विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात. आता किरण माने यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 

किरण माने यांनी काही तासांपूर्वी फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीचा अपमान करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

किरण माने काय म्हणाले?

"कोल्हापूर असो वा सातारा... छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी.

परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला ! ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही. मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय... ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली... ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं... त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले... त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???

यांचे 'बोलविते धनी' वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका.  कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे", असे किरण माने यांनी म्हटले आहे. 

यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर एकाने "एकूणच भाजपचे लोक अहंकारी आणि उन्मत्त झालेत याचा हा नमुना आहे", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "अगदी बरोबर बोललात", असे म्हटले आहे.