'मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने...', शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, 'तो खंगला तेव्हा...'

Raj Thackeray Tribute To Atul Parchure: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करुन पुन्हा जोमाने उभे राहत असतानाच अतुल परचुरेंचं सोमवारी आकस्मिक निधन झालं. ते 57 वर्षांचे होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 15, 2024, 07:35 AM IST
'मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने...', शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, 'तो खंगला तेव्हा...' title=
राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली

Raj Thackeray Tribute To Atul Parchure: ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला चटका लावून गेलं. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्यानंतर अतुल परचुरे पुन्हा एकदा जोमाने काम करु लागले होते. पण सोमवारी रात्री अचानक त्यांचं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून, सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. अतुल परचुरे यांचे शाळेपासूनचे मित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अगदी भावूक होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

राज म्हणाले, माझा शाळकरी मित्र

"आज आमचा अतुल गेला.... एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही," असं राज ठाकरेंनी शालेय आठवणी सांगता म्हटलं आहे.

पु. लं. देशपांडेंनी नाटक पाहिलं

"शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांडे यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली," असंही राज ठाकरे म्हणाले.

अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी...

"मी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेव्हा तो खंगला होता, तेव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता," असं राज यांनी भावनिक होत म्हटलं.  

अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने...

"मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता.  त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली 'एक्झिट' घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला. आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली," असं म्हणत राज यांनी आपली पोस्ट संपवली आहे.