'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आज घेणार निरोप

मालिका बंद होत असल्यानं प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.  

Updated: Feb 29, 2020, 06:19 PM IST
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आज घेणार निरोप  title=

मुंबई : गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका बंद होत असल्यानं प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मालिकेबद्दलच्या भावना मांडल्या. आज मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे शेवटचा भाग पाहाताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. मालिकेचा शेवटचा एपिसोड असल्यामुळे कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी देखील भावूक क्षण आहे. 

या मालिकेतील काही कलाकारांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सेटवरचे फोटो पोस्ट केले आहेत. 'माननीय डॉ. अमोल कोल्हे सरांसोबत काम करताना खरंच अंगावर शहारा यायचा म्हणजे असं एकपाठी अभिनेता नाही पहिला.. मी माझं भाग्य समजतो की मला संभाजी महाराजांचा मावळा कावजी ही भूमिका साकारता आली.. पण खंत वाटते की त्यांची अखेपर्यंत साथ देऊ शकलो नाही..' अशी खंत अभिनेता साईराज सोतेकरने फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली.

मालिकेचा पहिला एपिसोड २०१८ मध्ये प्रसारित झाला. गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. मालिकेचा शेवटचा एपिसोड काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये चित्रीत करण्यात आहे .त्यानंतर १४ तारखेला पुण्यात मालिकेच्या शेवटच्या भागातली काही दृश्यं चित्रीत करण्यात आली.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर त्याच वेळात ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.