म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं दुबईत पोस्टमॉर्टम होणार

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 25, 2018, 04:48 PM IST
म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं दुबईत पोस्टमॉर्टम होणार title=

दुबई :  बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात येणार आहे. याआधी श्रीदेवींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. दुबई हे युएईमधलं प्रमुख शहर आहे. इथल्या कायद्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम करून केलं जातं.

का करतात पोस्टमॉर्टम?

पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात. हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात. यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.

लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या श्रीदेवी

श्रीदेवी नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यावेळी त्यांच्यासोबत नवरा बोनी कपूर आणि छोटी मुलगी होती

१९६७मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण

१९६३ साली जन्म झालेल्या श्रीदेवींनी १९६७मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. श्रीदेवींनी हिंदीबरोबरच तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्ल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २०१२ साली त्यांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून कमबॅक केलं. २०१३ साली त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

तामीळनाडूमध्ये झाला जन्म

श्रीदेवींचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली तामीळनाडूच्या शिवकाशीमध्ये झाला होता. चार वर्षांची असतानाच त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. कंधन करुणई हा त्यांचा पहिला चित्रपट होता. बाल कलाकार म्हणून श्रीदेवींनी तेलगू आणि मल्ल्याळम चित्रपटातही काम केलं होतं.

१९७८ साली बॉलीवूडमध्ये

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाव कमावल्यावर श्रीदेवी १९७८मध्ये मुख्य कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये दिसल्या. सोलहवा सावन हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. ८० च्या दशकामध्ये श्रीदेवी यशाच्या शिखरावर पोहोचल्या. या प्रसिद्धीमुळे श्रीदेवींना फिमेल सुपरस्टार म्हणूनही ओळख मिळाली.

जुदाईनंतर घेतला ब्रेक

१९९७ साली आलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी १५ वर्ष ब्रेक घेतला. २०१२ साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून त्यांनी कमबॅक केलं आणि पुन्हा स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं. २०१७ साली आलेला मॉम हा चित्रपटही यशस्वी ठरला. मॉम हा श्रीदेवींचा ३००वा चित्रपट होता.