जाणून घ्या दररोज ३० मिनिटे नियमित चालण्याचे फायदे

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते.

Updated: Jun 4, 2019, 08:37 AM IST
जाणून घ्या दररोज ३० मिनिटे नियमित चालण्याचे फायदे  title=

मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्य़ग्र वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते. लक्षात ठेवा असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर सोडू नका. 

चालणे हा व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम निरोगी राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो.

- एकही पैसा खर्च न करता येणारा व्यायाम प्रकार.
- कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार.
- शरीर सुदृढ, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार.
- सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला होणारा पुरवठा. 
- हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले 'डी' जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते.
- चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
- सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
- चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत.
- चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
- एकाग्रता आणि चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
- वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार सर्वात उत्तम.
- चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते.
- चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
- दररोज एक तास चालल्यास संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
- चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
- नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते.
- नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
- नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.