72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय?

एकीकडे पावसाळा ऋतु सुरु झाला असताना उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आली आहे. उष्माघातामुळे 54 जणांचा मृत्य झाल्याचा दावा केला जात आहे. 

Updated: Jun 18, 2023, 10:58 PM IST
72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय? title=

Heatwave in UP: एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर, दुसरीकडे मान्सूनची हुकलावणी देत असतानाच उत्तर प्रदेशात वेगळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर सुरु आहे. उष्माघातामुळे 72 तासांत 54 मृत्यू झाल्याचे वृत्त  समोर आले. तर, 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, या स्थितीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याचे समजते. 

5 जूनला 23 जणांचा मृत्यू

बलिया येथील सर्व रुग्णालये भरली आहेत. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त  जिल्हा रुग्णालयातील आहे. खाजगी रुग्णालयातील तपशील समोर आलेला नाही.  संपूर्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये देकील अशा प्रकारे रुग्ण दाखल झालेले असावेत अशी शंका देखील उपस्थित केली जातेय.

छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि ताप

रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या या रुग्णांना ताप येत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अधिकांश रुग्णांनी शातीत दुखत असल्याचे सांगितले. यामुळे हे मृत्यू केवळ उष्माघातामुळे झाले नसावेत अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. यामुळे ज्या परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार असल्याचे वरिष्ठ सरकारी डॉक्टर ए.के. सिंग यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

उष्माघाताची लक्षणं

थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, उलटी 
ताप ही उष्माघाताची प्रमुख लक्षणं आहेत. उष्माघातामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे उलट्या, पोटदुखी, ताप अशा समस्या सुरू होतात. अतिउष्णतेमुळे अनेकदा अस्वस्थ वाटतं शिवाय रक्तदाबही वाढतो. 

उष्माघात झाल्यास काय कराल?

उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड आणि सावलीच्या ठिकाणी झोपवा. त्याचं शरीर ओल्या कपड्यानं पुसून घ्यावं, डोक्यावर साधं पाणी टाकत राहा. त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या