'अली' - 'बजरंग बली' झुंज थांबवा, आझम खान यांनी सुचवला नवा पर्याय

'अली' विरुद्ध 'बजरंग बली' असं वक्तव्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं होतं

Updated: Apr 12, 2019, 12:54 PM IST
'अली' - 'बजरंग बली' झुंज थांबवा, आझम खान यांनी सुचवला नवा पर्याय  title=

रामपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता संपलंय. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार आझम खान यांनी रामपूरमध्ये किले मैदानात एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी, 'आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलंय आणि बीजेपीची शेवटची यात्रा निघालीय... महाआघाडीच जिंकलीय ... आज त्यांचा आहे पण उद्या मात्र तुमचाच आहे' असं म्हणत त्यांनी जनतेला साद घातली. परंतु, यावेळी त्यांनी 'बजरंग बली' आणि 'अली'बद्दलच्या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 

व्हिडिओ : महाआघाडीला 'अली'वर तर आम्हालाही 'बजरंग बली'वर विश्वास - योगी

'अली' विरुद्ध 'बजरंग बली' असं वक्तव्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं होतं. मत देण्यासाठी आता हिंदुंना भाजपशिवाय पर्याय नसल्याचं सांगतानाच 'काँग्रेस-बीएसपी-एसपी महाआघाडीला 'अली'वर विश्वास आहे, तर आम्हालाही 'बजरंग बली'वर विश्वास आहे' असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. तसंच 'दुसऱ्या पक्षानी हे मान्य केलंय की बजरंग बलीचे अनुयायी त्यांना मतं देणार नाहीत' असं म्हणत त्यांनी महाआघाडी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला होता.

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत, 'मी एक नवं नाव देतो 'बजरंग अली'... असं म्हणत 'अली' आणि 'बजरंग बली' यांना झुंजवू नका असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.