२०१९ मध्ये जिंकलो तर पुढची ५० वर्ष आम्हाला कोणीही हरवू शकत नाही- अमित शहा

२०१४ नंतर पंतप्रधान मोदींनी थोडीही विश्रांती घेतलेली नाही.

Updated: Sep 9, 2018, 09:57 PM IST
२०१९ मध्ये जिंकलो तर पुढची ५० वर्ष आम्हाला कोणीही हरवू शकत नाही- अमित शहा title=

नवी दिल्ली: भाजपला २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळाला तर पुढची ५० वर्ष आम्हाला हरवणे अशक्य होऊन बसेल, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. ते रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी थोडीही विश्रांती घेतलेली नाही. या निवडणुकीनंतर मोदींनी ३०० लोकसभा मतदारसंघांना भेटी दिल्या. येत्या वर्षभरात ते उर्वरित मतदारसंघांनाही भेट देतील, असे अमित शहा यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवीन घोषणा दिली. ही घोषणा दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आयांच्या भाषणातील प्रमुख मुद्द्यांची माहिती पत्रकारांना दिली. 

महाआघाडीला स्वार्थी लोकांची आघाडी आहे. काँग्रेसचे नेतृत्व कोणी स्वीकारण्यास तयार नाही. छोटे-छोटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत. इतकेच काय पक्षातंर्गतही यावर एकमत नसल्याचे मोदींनी सांगितले.