आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

 Andhra Pradesh Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत केली जाईल. तर जखमींना 5 लाख रुपये मदत केली जाईल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 30, 2023, 08:17 AM IST
आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण
या अपघातामध्ये 29 जण जखमी झाले आहेत

आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, 'ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या ट्रेनला मागून धडक दिली. समोर असलेली ट्रेन संथ गतीने धावत होती. त्याचवेळी या ट्रेनने तिला मागून धडक दिली,' असं सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source

वेळापत्रक कोलमडलं

पूर्व रेल्वेच्या या अफघातानंतर रेल्वेकडून एक पत्रक जारी करण्यात आला आहे. डीआरएम/वाल्टेयमर (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजेर, वाल्टेयर डिव्हीजन) आणि त्यांच्या टीमकडून मदतकार्य सुरु आहे. मदतकार्यामध्ये स्थानिक प्रशासनही सहभागी झालं आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष ट्रेन्ससहीत मदतीसाठीची उपकरणे घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. रेल्वेने हेल्पलाइन नंबरही जारी केला आहे. या अपघातानंतर चेन्नई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडलं आहे. या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत अनेक ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे.
 

मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा

पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अपघातग्रस्त सर्व लोकांना मदत करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. पंतप्रधान मोदींनी शोक संपप्त कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली," असं म्हटलं आहे. 

15 लाखांची मदत केली जाणार

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत केली जाईल. तर जखमींना 5 लाख रुपये मदत केली जाईल. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातनेवाईकाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून दिली जाईल. तर 50 हजार रुपयांची मदत जखमींना केली जाईल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातानंतर खेद व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश दिलेत.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More