बालासोर रेल्वे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; CBIकडून 3 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक

Balasore Train Accident: बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. बालासोर रेल्वे अपघातात 292 जणांनी जीव गमावला होता. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 7, 2023, 07:22 PM IST
बालासोर रेल्वे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; CBIकडून 3 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक title=
CBI arrests three railways officials in Balasore train crash

Balasore Train Accident: ओडिशा येथे झालेल्या बालासोर येथे घडलेल्या भीषण ट्रेन दुर्घटनेत आत्तापर्यंतची मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI)ने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपांविरोधात भारतीय दंड संहिता 304 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालासोर रेल्वे अपघातात 292 जणांनी जीव गमावला होता. (Balasore Train Accident News Update)

अरुण कुमार महंत (ज्युनिअर इंजिनीअर), एमडी आमिर खान (ज्युनिअर सेक्शन) आणि पापू कुमार (टेक्निशिअन) या तीन रेल्वे अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांविरोधात आयपीसी 201 अंतर्गंत गुन्ह्याचे पुरावे गायब करणे, अपघाताबाबत चुकीची मागणी देणे, असे कलम लावण्यात आले आहेत. आयपीसी कलम 304 अन्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्हाच्या गंभीरतेनुसार आजीवन कारावास किंवा दंड किंवा सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

दुर्घटनाग्रस्त स्टेशन जप्त

बालासोर येथील ज्या बहानगा रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली होती तिथून रोज जवळसाप 170 ट्रेन जातात. दुर्घटनेनंतर सीबीआयने लॉग बुक, रिले पॅनेल आणि उपकरण ताब्यात घेऊन स्टेशन सील करण्यात आले आहे. त्यामुळं आथा बहनगा स्थानकात एकही ट्रेनला थांबा नाहीये. 2 जून रोजी  ही दुर्घटना झाली होती. यात 292 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1208 जण गंभीर जखमी झाले होते. 

अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

बालासोर अपघातानंतर अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. पूर्व रेल्वे विभागातील महाप्रबंधक अर्चना जोशी यांची बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागी अनिल कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच, रेल्वे विभागाने महाप्रबंधक आणि रेल्वे मंडळाचे प्रबंधकासह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. 

मानवी चुकीमुळं घडला अपघात

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच बालासोर रेल्वे अपघाताचा अहवाल रेल्वे मंडळाकडे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सोपवला होता. या अहवालात ही अपघात मानवी चुकीमुळं घडल्याचे असल्याचे आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला चुकीचा सिग्नल दिल्याचे नमूद करण्यात आले होते.