'आत्मनिर्भर पॅकेज जीडीपीच्या अवघे १.६ टक्के, मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल'

केंद्र सरकारने मला आकडेवारीबाबत खोटे ठरवून दाखवावे. मी निर्मला सीतारामन यांच्याशी जाहीरपणे चर्चा करायला तयार आहे.

Updated: May 17, 2020, 06:39 PM IST
'आत्मनिर्भर पॅकेज जीडीपीच्या अवघे १.६ टक्के, मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल' title=

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आत्मनिर्भर पॅकेजच्या आकडेवारीबाबत मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Aatmanirbhar package 20 लाख कोटींचे असेल, असे सांगितले होते. हे प्रमाण देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के इतके असल्याचेही मोदींनी म्हटले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Aatmanirbhar package चा तपशील जाहीर केल्यानंतर आकडेवारीतील घोळ समोर आला आहे. केंद्र सरकारने केवळ ३.२२ लाख कोटींचीच आर्थिक मदत केली असून हे प्रमाण एकूण जीडीपीच्या अवघे १.६ टक्के इतकेच असल्याचा दावा, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. 

राहुल गांधींनी मजुरांची बॅग घेऊन चालायला हवे होते- निर्मला सीतारामन

 

मला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारायचे आहेत. सरकारच्या दाव्यावर माझा आक्षेप आहे. केंद्र सरकारने मला आकडेवारीबाबत खोटे ठरवून दाखवावे. मी निर्मला सीतारामन यांच्याशी जाहीरपणे चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान आनंद शर्मा यांनी दिले. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

 

मोदी सरकार आर्थिक पॅकेजच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे. पंतप्रधान मोदींच्या कथनी आणि करणीत फरक नसायला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने मजुरांना वाऱ्यावर सोडल्याबद्दल आणि त्यांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. निर्मला सीतारामन यांनी इतरांना प्रश्न विचारण्याऐवजी उत्तरे द्यायला पाहिजेत. केंद्राच्या धोरणशुन्यतेमुळे गावी पायी चालत जाण्याची वेळ आली, याचे स्पष्टीकरण सरकारने दिलेच पाहिजे, अशी मागणीही आनंद शर्मा यांनी केली.