तब्बल 14,000 कोटी! India चं 'भारत' करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर

Cost Of Changing Country Name From India to Bharat: मागील काही कालावधीमध्ये अनेक शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यासाठी झालेल्या खर्चाची आकडेवारी फार मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशाचं नाव बदलायचं झाल्यास मोठा खर्च अपेक्षित केला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 6, 2023, 07:27 AM IST
तब्बल 14,000 कोटी! India चं 'भारत' करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर title=
देशाचं नाव यंदाच्या विशेष अधिवेशनात बदललं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Cost Of Changing Country Name From India to Bharat: देशाचं नाव बदलण्याचा केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा विचार असल्याचा दावा काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी केला आहे. जी-20 परिषदेमध्ये 9 सप्टेंबर रोजी पाहुण्या देशांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेल्या आमंत्रणांवर 'भारताचे राष्ट्रपती' असा उल्लेख असल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे. संसदेचं विशेष अधिवेशनही देशाचं नाव बदलण्यासाठी बोलवण्यात आल्याचा दावाही जयराम रमेश यांनी केला आहे. आतापर्यंत शहरांची नावं बदलण्याचा ट्रेण्ड दिसून येत होता. मात्र आता थेट देशाचं नाव बदलणार असल्याने सोशल मीडियावर चर्चांनाही उधाण आलं आहे. सध्या देशामध्ये 'इंडिया' आणि 'भारत' ही दोन्ही नावं वापरली जातात. इंग्रजीमध्ये 'इंडिया' आणि हिंदीमध्ये 'भारत' हे नाव वापरलं जातं. मात्र व्यक्त केल्या जात असलेल्या शक्यतेनुसार केंद्र सरकारने कलमांमध्ये बदल करुन 'इंडिया' हे नावच संविधानातून वगळल्यास सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये देशभरामध्ये बदल करण्यासाठी किती खर्च येईल याचीही चर्चा सुरु आहे. देशाचं नाव बदलल्यास किती खर्च येईल हे जाणून घेऊयाच मात्र त्याआधी आतापर्यंत बदलण्यात आलेल्या शहरांच्या नावांमध्ये बदल केल्याने किती खर्च झाला आहे यावर नजर टाकूयात.

शहरांची आणि राज्यांची नावं बदलायला किती खर्च येतो?

भारतामधील अनेक शहरांची नावं मागील काही वर्षांमध्ये बदलण्यात आली आहेत. यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशचं नाव आघाडीवर आहे. येथे अनेक शहरांची नावं मागील काही वर्षांमध्ये बदलण्यात आली आहे. यातही अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. महाराष्ट्रामध्येही औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं आहे. तसेच उस्मानाबादचं नावही बदलून धाराशीव करण्यात आलं आहे. आता शहांची नावं बदलल्यानंतर सामान्यपणे 200 ते 500 कोटी रुपयांचा खर्च होतो. एखाद्या राज्याचं नाव बदलायचं म्हटलं तरी किमान खर्च हा 500 कोटींच्या घरात असतो. 

भारताचं नाव बदलण्यासाठी 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

आता अर्थात शहरांचं आणि राज्याचं नाव बदलण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च होत असतील तर देशाचं नाव बदलण्यासाठी अमाप खर्च होणं सहाजिक आहे. आऊटलूकने यासंदर्भात केलेल्या एका वृत्तांकनामध्ये 2018 साली स्वित्झर्लंड नावाच्या एका आफ्रिकन देशाने आपलं नाव बदलून इस्वातिनी असं केलं. त्यावेळी या आकारमानाने छोट्या असलेल्या देशाचं नाव बदलण्यासाठी जवळपास 60 मिलियन डॉलर्सचा खर्च आला. याच आधारावर आकडेमोड केल्यास भारतासारख्या मोठ्या आकाराच्या देशाचं नाव बदलण्यासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

नक्की वाचा >> देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?

खर्च कशासाठी होतो?

एखाद्या जागेचं किंवा देशाचं नाव बदलतं तेव्हा त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवाशांचे पत्ते, कागदोपत्री उल्लेख बदलावे लागतात. त्यातही देशाचं नाव बदलायचं झाल्यास अगदी चलनी नोटांपासून ते आर्थिक संस्थांबरोबरच सरकारी संस्थांची नावं बदलावी लागतात. बऱ्याच ठिकाणी कागदोपत्री बदल असल्याने या कामामध्ये वेळ खर्च होतोच पण पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो.