दारुची बाटली, कंडोमचं पाकीट अन् दोघांचा होरपळून मृत्यू! प्रेयसीच्या लास्ट कॉलने उलगडलं रहस्य

Crime News Two Cousins Burnt Alive: पोलिसांनी जवळपास एक आठवडा या प्रकरणाचा तपास केला. होरपळून मृत्यू पावलेल्या तरुणांच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता असं पोलिसांच्या लक्षात आलं. दरवाजा उघडा असताना आग लागल्यावर दोघे पळाले का नाही असा प्रश्न पोलिसांना पडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 26, 2024, 09:02 AM IST
दारुची बाटली, कंडोमचं पाकीट अन् दोघांचा होरपळून मृत्यू! प्रेयसीच्या लास्ट कॉलने उलगडलं रहस्य title=
पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे

Crime News Two Cousins Burnt Alive: उत्तर प्रदेशमधील कानपूर सेन येथील कसगवामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवड्याभरापूर्वी या ठिकाणी 2 मावस भावांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचं उघड झालं आहे. या मावस भावांच्या खोलीमध्ये दारुची बाटली आणि कंडोम ठेऊन जाणीवपूर्व आग लावण्यात आली होती. 10 लीटर पेट्रोल टाकून ही आग लावण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा झाला आहे. घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतर फॉरेन्सिक तपास आणि घटनास्थळावर आढळून आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही दुर्घटना नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये पिता-पुत्राला अटक केली आहे.

दारुची बाटली अन् कंडोमचं पाकीट

या प्रकरणासंदर्भात दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र कुमार यांनी अधिक माहिती दिली. दोन्ही भावांना जीवे मारण्यासाठी पिता-पुत्राने अगदी सविस्तर नियोजन केलं होतं. हत्या करणाऱ्यांनी आग लावण्याआधी दोन्ही भावांच्या बाजूला बिछान्यावर दारुची बाटली आणि कंडोमचं पाकीट ठेवलं. त्यानंतर 10 लीटर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आलं. आग लावल्यानंतर देह जळवल्यावर ओळख पटू नये या हेतूने दोघांच्या शरीरावर अधिक पेट्रोल टाकण्यात आलं. रविवारी या घटनेसंदर्भातील सविस्तर घटनाक्रम समोर आला. 

नक्की घडलं काय?

20 मार्च रोजी कानपूर शहरातील सेन पश्चिम परिसरामधील कसिगवा येथे सुनिल आणि राज या दोन सख्ख्या भावांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आता ही आग सुनिलच्या चुलत्याने आणि चुलत भावाने लावल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणामध्ये मृतांचा चुलत भाऊ विनोद आणि त्याचे वडील बदलू यांना अटक करण्यात आली आहे. दोन मावस भावांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघांचा मृतदेह अगदी जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

प्रेयसीला शेवटचा कॉल

मरण पावलेल्या सुनीलच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेवटचा त्याच्या प्रेयसीबरोबर बोलला होता. घराच्याबाहेर काही लोक उभे असल्याचं सुनीलने त्याच्या प्रेयसीला सांगितलं होतं. माझा सध्या चुलत भाऊ विनोद आणि काका बदलूबरोबर वाद सुरु आहे, असंही सुनीलने प्रेयसीला सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरु केला आणि त्यांना परिस्थितीजन्य पुरावेही या दोघांविरुद्ध असल्याचं स्पष्ट झालं.

दरवाला उघडा होता तरी...

ज्या घराला आग लागली त्याचा दरवाजा उघडा असल्याचं स्पष्ट झालं. दरवाजा उघडा असताना हे दोन्ही भाऊ खोलीमधून पळून का गेले नाहीत असा प्रश्न पोलिसांना पडला. स्वत: या दोघांनी आत्महत्या केली असं गृहीत धरलं तरी आग लावताना त्यांनी खोलीचं दार आतून बंद का केलं नाही? असा प्रश्न पोलिसांना पडला. तसेच प्रेयसीला दिलेल्या माहितीमध्ये काही लोक घराबाहेर उभे असल्याचं सुनीलने सांगितलं होतं. सुनीलच्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांना विनोद आणि त्याचे वडील बदलू यांची चौकशी केली. त्यावेळेस पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निर्देशक रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील आणि राज हे आपल्या चुलत भावांना शिव्या देत बोलायचे. यामुळे विनोद फार दुखावला जायचा. त्यामुळेच त्याने विनोदच्या हत्येचा कट केला. त्यामुळे त्याने आपली बाईकमध्ये दोनदा टाकी फूल करेपर्यंत पेट्रोल टाकलं. 19 मार्चला सुनीलने आपल्या घरी काही काम करत होता. रात्री तो आपल्या राज नावाच्या मावस भावाबरोबर झोपला होता. 

समोर आलं सत्य...

दोघांना झोपलेलं पाहून विनोदने त्यांच्या बिछान्यावर एक दारुची बाटली आणि कंडोमचं पाकीट टाकलं. त्यानंतर बादलीभर पेट्रोल या दोघांवर टाकलं. झोपेत आपल्या अंगावर काहीतरी पडल्याचं कळेपर्यंत विनोदने या दोघांच्या अंगावर माचीसची जळती काडी टाकली. पोलिसांच्या तपासात दोघेही दारु पिऊन होते असं वाटावं म्हणून आपण बिछान्यावर दारुची बाटली टाकल्याचं सांगितलं. तसेच खोलीमध्ये एखाद्या मुलीला घेऊन हे दोघे आले होते असं वाटावं म्हणून कंडोमचं पाकीट टाकलेलं असंही विनोदने सांगितलं. मात्र पोलिसांनी तपासामध्ये खरी माहिती समोर आणत आरोपींना अटक केली.