मोदी सरकार जम्मू-काश्मीरचा 'भूगोल' बदलणार, मतदारसंघाची पुनर्रचना होणार

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा बदल होणार?

Updated: Jun 4, 2019, 05:58 PM IST
मोदी सरकार जम्मू-काश्मीरचा 'भूगोल' बदलणार, मतदारसंघाची पुनर्रचना होणार title=

नवी दिल्‍ली : गृह मंत्रालय जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचं लवकरच गठन करण्यात येणार आहे. राज्‍यातील काही जागा SC/ST प्रवर्गासाठी आरक्षित ठेवल्या जावू शकतात.

जम्मू-काश्मीरमध्ये यामुळे राजकीय क्षेत्र बदलणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. जम्मू-काश्मीरबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. अमित शहा यांच्यासोबत गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि गृह सचिव देखील बैठकीला उपस्थित होते.

तीन दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. राज्यपाल मलिक यांनी अमित शहा यांची भेट घेत जम्मू-काश्मीरवर एक ३ पानांचा अहवाल सादर केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली जावू शकते.

पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाच्या सीमा बदलण्यात येणार आहेत. तर काही जागा या आरक्षित केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या असलेले मतदारसंघ योग्य प्रकारे नसल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. जम्मूसोबत न्याय होत नसल्याचा त्यांचं मत आहे. सध्या काश्मीरमधून जास्त आमदार निवडून विधानसभेत जातात. सरकारचं म्हणणं आहे की, क्षेत्रीय भेदभाव संपवण्यासाठी हा निर्णय़ घेतला जावू शकतो. जर असं झालं तर जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री देखील बनू शकतो.

कोणत्या भागात किती जागा?

काश्मीर - ४६

जम्मू- ३७

लडाख- ४

कोणाचे किती आमदार?

पीडीपी     28 
भाजप    25 
नॅशनल कॉन्फरेन्स 15
काँग्रेस     12

धर्मनिहाय टक्केवारी

मुस्लीम- 68.31%
हिंदू- 28.44%
शीख- 1.87%
ख्रिश्चन - 0.28%