सरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 30, 2017, 11:09 PM IST
सरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारवर घणाघात करताना राहुल गांधी सोमवारी म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटी च्या 'टॉरपीडो'मुळे देशाची अर्थव्यवस्था कमकूवत केली. नोटबंदीचे परिणाम पूर्ण देश भोगत असतानाच सरकारने जीएसटीचा निर्णय घेतला. नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम तसेच देशभरातील अनेक जाणकारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद तसेच, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेशीही उपस्थीत होते.

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे मन ओळखू शकले नाहीत. लोक समस्येने ग्रासले असताना नोटबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती करून सरकार आनंद साजरा करत आहे. खरेतर यात आनंद साजरा करण्यासारखी कोणती गोष्ट आहे, हे मला अद्याप समजू शकली नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी अधिक आक्रमक

दरम्यान,गुजरातमध्ये विधानसभा नवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी गुजरातची निवडणूक महत्त्वाची आहे. केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे गुजरातमध्ये भाजपच सत्तेत आहे. तर, १०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. कारण, भाजपला सत्ता टिकवण्याचे तर, कॉंग्रेसला पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान या निवडणुकीत असणार आहे. त्यामुळे राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत.