पाकचं शेपुट वाकडंच; पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा

पाकिस्तानच्या या कृतीबद्दल भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी संताप व्यक्त केला. 

Updated: Apr 17, 2020, 03:38 PM IST
पाकचं शेपुट वाकडंच; पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा title=

श्रीनगर: संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकत्र येऊन लढत असताना पाकिस्तान मात्र काही सुधरायला तयार नाही. पाकिस्तानी सैन्याकडून शुक्रवारी काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये एक भारतीय तरुण जखमी झाला. 

भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण सीमारेषेलगतच्या कसबा आणि किरनी सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडूनही तितकेच चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 

मोठा खुलासा! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांकरता पाकिस्तानमध्ये दोन नवीन संघटना

पाकिस्तानच्या या कृतीबद्दल भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी संताप व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात भारत फक्त स्वत:च्याच नागरिकांची काळजी घेत नाही. तर इतर देशांमध्येही वैद्यकीय पथके आणि औषधे पाठवत आहे. याउलट पाकिस्तान अजूनही दहशतवाद पसरवण्यातच मग्न आहे. ही चांगली गोष्ट नव्हे, असे लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी म्हटले. 

गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरच्या दुधनियाल परिसरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. गेल्या काही काळापासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी या तळाचा सातत्याने वापर केला जात होता. तर  १ एप्रिल रोजी केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले होते.