आतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा

पाहा आतापर्यंत मोदींनी कोणत्या घोषणा केल्या...

Updated: Apr 14, 2020, 12:55 PM IST
आतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. मोदींनी केलेल्या भाषणात भारतीयांसाठी काहीतरी नवीन असतं, असं जे देशातील विकास, स्थिरता, राष्ट्र निर्मितीसाठी अतिशय आवश्यक ठरतं. मंगळवारी नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाला संबोधित करत कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा दुसऱ्यांदा 2.0 लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. 

पहिलं भाषण - नोटबंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी भाषणादरम्यान 8 वाजता, रात्री 12 वाजल्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात येणार नसल्याची घोषणा केली.

दुसरं भाषण - लोकहित

31 डिसेंबर 2016 रोजी मोदींनी दुसऱ्यांदा देशाला संबोधित केलं. नोटाबंदी आणि काळा पैसा याबद्दल त्यांनी जनतेशी संवाद साधला. बँकांनी गरिबांना लक्षात घेऊन काम करावं आणि जनहितार्थ योग्य निर्णय घ्यावे असं सांगिलं होतं.

तिसरं भाषण - पुलवामावर प्रतिक्रिया

15 फेब्रुवारी 2019ला पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या पुलवामा हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया दिली. 'मी लोकांच्या भावना आणि राग समजू शकतो. आपण आपल्या जवानांना, सैन्याला संपूर्ण स्वतंत्र्यता दिली आहे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे' असं मोदींनी भाषणात म्हटलं होतं.

चौथं भाषण - मिशन शक्ती 

27 मार्च 2019 या दिवशी मोदींनी मिशन शक्तीला मिळालेल्या यशाबद्दल देशवासियांना संबोधित केलं होतं. यावेळी मोदींनी, 'आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी अंतराच्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) एक लाईव्ह सॅटेलाईट मारला. हा लाईव्ह सॅटेलाईट, उपग्रह पूर्वनिर्धारित लक्ष्य होता, ज्याला ऍन्टी सॅटेलाईट मिसाईलद्वारे मारण्यात आलं. ही मोहीम तीन मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण झाली' असल्याचं सांगितलं होतं.

पाचवं भाषण - अनुच्छेद 370

जम्मू-काश्मीमधून अनुच्छेद 370 हटविण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 8 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केलं. मोदींनी यावेळी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याबाबत आणि भ्रष्टाचारापासून मुक्त होऊन रोजगार उपलब्ध करण्याचा विश्वास दिला होता. 

सहावं भाषण - शास्त्रज्ञांना प्रोत्साहन

चांद्रयान-2 चंद्रावर उतरण्यापूर्वी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 सप्टेंबर 2019 या दिवशी आपल्या भाषणात शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केलं. पीएम मोदींनी इस्त्रोच्या कंट्रोल सेंटरमधून इस्त्रोच्या वैज्ञानिकांना आणि देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण निश्चितपणे यात यशस्वी होऊ असा विश्वासही व्यक्त केला होता.

सातवं भाषण - शांततेचा संदेश 

9 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान मोदींनी अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि पंजाब कर्तारपूर कॉरिडोरबाबत भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी देशातील जनतेला शांती, सुसंवाद आणि सद्भावनेचं वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं होतं.

आठवं भाषण - जनता कर्फ्यू

19 मार्च 2020 रात्री 8 वाजता मोदींनी कोरोना व्हायरसबाबत जनतेशी संवाद साधला. त्यांनी लोकांना सहकार्याबद्दल आवाहन करत, रविवारी जनता कर्फ्यू लागू केला. त्याशिवाय 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता 5 मिनिटांसाठी थाळ्या, घंटी वाजवून कोरोनाच्या कठीण परिस्थितीत आपल्याला अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्याचं आवाहन केलं होतं.

नववं भाषण - 21 दिवस लॉकडाऊन

24 मार्च 2020 रोजी मोदींनी देशाला संबोधित केलेल्या भाषणात कोरोनाशी लढण्यासाठी देशवासियांकडे काही दिवस मागितले. रात्री 8 वाजता त्यांनी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली.

दहावं भाषण - नऊ मिनिटं

पंतप्रधानांनी 3 एप्रिल 2020ला जनतेला, 5 एप्रिल या दिवशी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन आपल्या घरात, दारात, खिडक्यांमध्ये दिवे, पणती, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. प्रकाशाच्या ताकदीने कोरोनाचा अंधार घालवण्यासाठी, कोरोनावर एकत्र मात करण्याचा संदेश त्यांनी दिला होता.

अकरावं भाषण - 2.0 लॉकडाऊन

14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोदींनी 3 मेपर्यंत देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला आहे.