Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.

राजीव कासले | Updated: Apr 17, 2024, 06:29 PM IST
Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार title=

Loksabha 2024 : देशात यंदा सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. वृद्ध मतदारांना घरातून मतदान, परदेशी मतदारांसाठी पोस्टल मतदान, दिव्यांग मतदातांसाठी विशेष सुविधा जाहीर करण्यात आल्यात आहेत. असा एक अनोखा प्रयोग राबवला जाणार आहे. यात आई-वडिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स दिले जाणार आहेत. 

मुलांना परीक्षेत अतिरिक्त गुण मिळणार
हा अभिनव प्रयोग उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) गोंडा जिल्हा प्रशासनाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गोंडा जिल्ह्यातील मतदारांना जागरुक करण्यासाठी विविध अभियान राबवले जातात. यात 15 हजाराहून अधिक मतदारांचा शपथ कार्यक्रम, ट्रान्सजेंडर संवाद, गोंडा मतदान लीग, हर घर सकोरा, मंगल दल हेतू स्पर्धा, रॅली, नुक्कड नाटक, गोष्टी अशा प्रयोगांचा समावेश आहे.

शाळेतील मुलांचा सहभाग
शाळेत शिकणारी मुलांना मतदानाचा हक्क नाही. पण मतदानाचा टक्का (Voting Percentage) वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करण्याची अभिनव कल्पना गोंडाच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी मांडली. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करायचं आहे. 20 मे रोजी आई-वडिल मतदान करतील यासाठी मुलांनी त्यांच्याकडे आग्रह धरायचा आहे. ज्या मुलांचे आई-वडिल मतदान करतील, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचे गुण दिले जाणार आहेत. पण यासाठी मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावल्याचे सेल्फी शाळेत दाखवावे लागणार आहेत. 

मतदानाचा पहिला टप्पा
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावला....21 राज्यांतील 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...तामिळनाडूच्या सर्व 39 जागांव्यतिरिक्त राजस्थानच्या 12 आणि यूपीच्या 8 जागांवर मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाम आणि त्रिपुरात सभा घेतल्या. तर नजीबाबादमध्ये अखिलेश यादव आणि सहारनपूर मध्ये प्रियांका वाड्रा प्रचारात उतरल्या.

महाराष्ट्रात पाच मतदार संघात मतदान
महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणाराय. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याठिकाणचा प्रचार आज संपला.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर देशात 21 राज्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.