...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Updated: Dec 12, 2018, 12:15 PM IST
...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात! title=

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव मान्य केलाय. भाजपला अधिक मतं मिळाली असली तरी बहुमत मात्र मिळालेलं नाही... त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप दावा करणार नाही. संख्याबळासमोर आम्ही आमची मान झुकवतो... असं म्हणत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा आज सकाळी राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यांनी ज्या शैलीत हा जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली... त्यावेळी, बहुमत न जमवू शकल्यानं अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत भाषण देतानाच १३ दिवसांच्या सरकारचा राजीनामा सादर केला होता. 'जनतेनं विरोधी पक्षाला जनादेश दिला नव्हता परंतु, लोकशाहीत बहुमताचा खेळ असतो... अशा वेळी आम्ही संख्याबळासमोर मान झुकवतो. मी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपवण्यासाठी जात आहे' असं म्हणत त्यांनी जनादेशाला सर्वोत्तम स्थान दिलं होतं.

'पराभवाची जबाबदारी फक्त माझीच'

'जनादेश आमच्या बाजूने असला तरी आमदारांचं आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असं शिवराज सिंह चौहान म्हणालेत. पराभवाची जबाबदारी माझी, माझी आणि फक्त माझीच आहे... आता मी संपूर्ण मुक्त आहे... पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रयत्न केले... आम्हाला मतंही जास्त मिळाली... पणं स्पष्ट बहुमत मात्र मिळालं नाही... कमलनाथ यांना आम्ही शुभेच्छा देतो...' असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

मध्यप्रदेश निवडणूक निकाल २०१८

मध्यप्रदेशात ११४ जागांवर ताबा मिळवत काँग्रेस हा इथला सर्वात मोठा पक्ष ठरलाय. या निकालानंतर आज बसपाच्या प्रमुख मायावतींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. मध्य प्रदेशात काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाच्या एका आमदारानं आधीच त्यांना पाठिंबा दिलाय. त्यापाठोपाठ बसपाच्य दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानं आता काँग्रेसनं बहुमाताचा आकडा ओलांडलाय. काँग्रेसकडे आता ११७ आमदार असून भाजपाकडे सध्या १०९ आमदार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस दावा करणार स्पष्ट आहे. आज सकाळी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय... दुसरीकडे तिकडे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी उद्या काँग्रेसच्या आमदारांना भेटीची वेळ दिलीय.