गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.

Updated: Sep 16, 2019, 01:23 PM IST
गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम title=

नवी दिल्ली : गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा कायम राहणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जाबाबत राष्ट्रवादीला नोटीस बजावली होती. त्यानंतर आयोगाकडे झालेल्या सुनावणीत पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम राहिला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी निराशाजनक झाली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या ४ जागांवर विजय मिळवला. यातल्या साताऱ्याच्या जागेवरून निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजे भोसलेंनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनिल तटकरे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा विजय झाला आहे.