आरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट

मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 22, 2018, 05:27 PM IST
आरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट  title=

मुंबई : मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो. रिर्जव बँक देशभरातले मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मोबाईल वॉलेट कंपन्यांनी आरबीआयचे आदेश न मानल्यामुळे ही कारवाई होऊ शकते. या मोबाईल वॉलेट कंपन्यांना १ मार्चपर्यंत आरबीआयचे आदेश पूर्ण करावे लागणार आहेत. जर असं झालं नाही तर तुमचं मोबाईल वॉलेट अकाऊंट बंद होईल.

केवायसीची माहिती दिली नाही

रिर्जव बँकेनं देशभरातल्या लायसन्स असलेल्या मोबाईल वॉलेट कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या केवायसीची अट पूर्ण केली नाही. २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ग्राहकांच्या केवायसीची माहिती द्यायला आरबीआयनं सांगितलं होतं. मोबाईल वॉलेट कंपन्यांनी ही अट पूर्ण केली नाही तर १ मार्चपासून मोबईल वॉलेट बंद होतील.

९१ टक्के अकाऊंट होऊ शकतात बंद

आत्तापर्यंत देशातल्या ९ टक्क्यांहून कमी मोबाईल वॉलेट कंपन्यांना ग्राहकांनी त्यांचे केवायसी दिले आहेत. त्यामुळे देशातल्या ९१ टक्के ग्राहकांनी त्यांचे केवायसी मोबईल वॉलेट कंपन्यांना दिलेले नाहीत. अशा ९१ टक्के ग्राहकांचं मोबईल वॉलेट बंद होण्याची शक्यता आहे.

लवकर पूर्ण करा केवायसी

एअरटेल मनी, पेटीएम सारख्या मोबाईल वॉलेट कंपन्या ग्राहकांना वेळोवेळी केवायसी पूर्ण करण्याची विनंती करत आहेत. ग्राहकांना या मोबईल वॉलेटला आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करावं लागणार आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यावर केवायसी पूर्ण होणार आहे. केवायसी पूर्ण झाल्यावर ग्राहकांना त्यांचं मोबाईल वॉलेट वापरता येईल.