कागदपत्रं सांभाळता न येणारे सरकार सुरक्षा काय पुरवणार- शरद पवार

राफेल करार जवानांच्या हिताचा नसावा.

Updated: Mar 7, 2019, 01:57 PM IST
कागदपत्रं सांभाळता न येणारे सरकार सुरक्षा काय पुरवणार- शरद पवार title=

नवी दिल्ली: देशाच्या संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे चोरीला जात असतील तर हे सरकार इतरांना सुरक्षा काय पुरवणार, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. सरकारने दिलेली ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रे चोरीला जाऊच कशी शकतात? ही बाब इतके दिवस सरकारने दडवून का ठेवली?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या कागदपत्रांमुळे काहीतरी महत्त्वाची गोष्ट समोर येणार होती. राफेल करार जवानांच्या हिताचा नसावा. त्यामुळे कोणीतरी त्यांच्या हितासाठी ही माहिती बाहेर पुरवत असल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला.

याशिवाय, राफेल कराराबाबत सरकारने घेतलेली भूमिकाही चकित करणारी आहे. बोफोर्स घोटाळ्याच्या वेळी याच लोकांनी चौकशीची मागणी केली होती. तेच आज चौकशी टाळत आहेत. कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. यावरुन सरकारची एकूण नीती काय आहे, ते स्पष्ट होते, असे पवार यांनी सांगितले. 

चौकीदाराची चौकशी झालीच पाहिजे; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

तसेच सरकार पुलवामा हल्ल्याचे राजकारण करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारचे प्रतिनिधी हजर होते. मात्र, भाजपचा कोणताही प्रतिनिधी यावेळी हजर नव्हता. परंतु, भाजपकडून बैठकीला कोणीही उपस्थित नव्हते. सर्व पक्ष यावर राजकारण करत नसताना भाजप मात्र याचा राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय, असेही पवारांनी सांगितले.

मोदींविरोधात पुरावे मिळाले आता खटला भरायची वेळ- राहुल गांधी