कार-ट्रक अपघातात औरंगाबादचे सात ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबादचे सात जण जागीच ठार झालेत.  

Updated: Jun 2, 2019, 08:15 PM IST
कार-ट्रक अपघातात औरंगाबादचे सात ठार title=

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबादचे सात जण जागीच ठार झालेत. बेळगावमधील श्रीनगर येथील महामार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. तसेच या अपघातात ट्रकची समोरील बाजू चेपली गेली आहे. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळी कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन घेतल्यानंतर कारमधील सर्व जण हे गोव्यात फिरण्यासाठी जात होते. मात्र, काळाने त्यांचावर झडप घातली.

 

आज दुपारी बेळगावच्या श्रीनगर गार्डनजवळील पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजुला गेली. याचदरम्यान,कोल्हापूरहून येत असलेल्या एका भरधाव ट्रकने अपघातग्रस्त कारला जोरदार धडक दिली. यात कारचा पूर्णत: चेंदामेदा झाला. मृत सगळे औरंगाबाद जवळच्या दौलताबाद आणि शरणापूरचे आहेत. सर्व मित्र गोव्याला फिरण्यासाठी जात होते. आज सकाळी कोल्हापूरला  महालक्ष्मी दर्शन घेतले. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले होते. मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला.

आज सकाळी कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी सेल्फी काढला होता.

कारमधील प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत  झाली. या अत्यंत भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या सातही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नंदू पवार (२८), अमोल नेवी(२६), सुरेश कणेरी(२९), अमोल चौरी (२६), महेश पांडळे (२८) महेश चावरे आणि गोपाळ पाटील यांचा मृत्यू झाला.