बळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला

कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही.   

Updated: Mar 6, 2023, 04:59 PM IST
बळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला title=

एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasoned Rain) संकट निर्माण झालेलं असतानाच कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव (Market Rate) मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. शेतकरी त्रस्त असल्याने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. यादरम्यान येवला तालुक्यात शेतकऱ्याने कांद्याला अग्निडाग देत आपला संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्याने दीड एकर शेतात लावलेल्या कांद्याची होळी (Holi) केली आहे. 

कृष्णा डोंगरे असं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण प्रशासनाने कोणतीही दाखल न घेतल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी दीड एकरमधील कांद्या आणत आग लावली. 

वैजापुरातही कांद्याला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं.

अकोल्यात कांद्याला भाव मिळण्यासाठी आंदोलन

अकोल्यात आज शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा जाळून होळी करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सध्या अकोल्यात कांद्याला 2 रुपये प्रतीकिलो भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केलं.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "चुलीवर कांदाभजी आंदोलन"

कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आणि गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. चुलीवर कांदाभजी आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी सामजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून कांदा भजी तळली.

मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात चुलीचा धुर जाऊ नये म्हणून "उज्वला गॅस "योजनेचा गवगवा केला. परंतु निरंतर वाढत चाललेल्या गॅस दरवाढीमुळे पुन्हा चुली पेटवण्याची वेळ आली असून याच्या निषेधार्थ व दरवाढ कमी करण्यात यावी तसंच नाफेडद्वारे खरेदी सुरू करून प्रतिक्विंटल २५०० रूपये कांद्याला हमीभाव द्यावा या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी हे अनोखे आंदोलन केले.