'विश्वजीत कदमांनी अपहरण करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला'

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून कुटुंबाला धोका असल्याचा देखील आरोप

Updated: May 11, 2019, 04:09 PM IST
'विश्वजीत कदमांनी अपहरण करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला' title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनुवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता असा आरोप साताऱ्याचे नेते अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

'सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील 2018 च्या पोटनिवडणूकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण केलं. त्यानंतर मला जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता.' असा खबळजनक आरोप साताऱ्याचे नेते अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. सांगलीमध्ये बिचुकले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून माझ्या कुटुंबाला धोका असून, कदम यांच्यावर कारवाई केली नाही तर, सांगलीत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बिचुकले यांनी दिला आहे.

'मी, माझी बायको, मुलगा यांच अपहरण आणि दमबाजी करून माझा अर्ज मागे घ्यायला लावलं होता. उमेदवारी अर्ज मागे घेताना निवडणूक कक्षात फक्त 5 लोक असावे असा नियम असतो. पण त्यावेळी 10 ते 12 लोकं कक्षात होते असा आरोप देखील त्यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून माझ्या कुटुंबाला धोका आहे. असा आरोप देखील अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.