अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतले

अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 20, 2024, 09:24 AM IST
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतले title=

Ajit Pawar Pink Jacket:  अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आज काल अजितदादा गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्याने अजितदादांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.

राष्ट्रवादीने कात टाकत असल्याने त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट वापरण्यास सुरुवात केली आहे.

जवळपास डझनभर जॅकेट खास शिवून घेतल्याची माहिती मिळतेय. आता जाहीर कार्यक्रमात अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरताना दिसतील. तसंच कंपनीच्या सूचनेप्रमाणे छातीवर घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह लावण्यास प्रारंभ केला आहे.

मात्र, अजित पवारांच्या या नवीन लूकवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. अंगावर गुलाबी जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर काळा रंग लावला जातोय दूर व्हावा अशी टीका अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केली आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत भाजप नेत्यांकडून तक्रारी

भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आलीय...अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्याही मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते मविआच्या उमेदवारांना निवडणुकीत मदत करत असल्याच्या तक्रारी केल्यायत...दिंडोरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे मतदारसंघाचे उदाहरण देत तक्रारींचा पाढा वाचलाय...तर शिंदेंच्या सेनेकडून देखील जालना, परभणीत मदत न झाल्याची नेत्यांनी तक्रार केलीय...दगाफटक्यामुळे जालना हा वर्षानुवर्षे निवडून आणणारा मतदारसंघ आपण मागवल्याची भावना व्यक्त करण्यात आलीय...तर लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ झाला, त्याचा फटका बसल्याचा देखील काहींचा सूर होता...त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लवकरात लवकरच जागा वाटप करण्याची मागणी करण्यात आलीय...