मेळघाटात भीषण अपघात! 50 प्रवाशांसहित बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली

Amravati Bus Accident: अतिदुर्गम मेळघाटात खाजगी बसला भीषण अपघात झाला असून तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 23, 2024, 10:10 AM IST
मेळघाटात भीषण अपघात! 50 प्रवाशांसहित बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली title=
amravati news A bus with 50 passengers fell directly into the water from the bridge in melghat

Amravati Bus Accident: अमरावती येथील अतिदुर्गम मेळघाटात भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली आहे. अपघात इतका भीषण होता की पुल थेट पाण्यात कोसळली असून या अपघातात 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावरच हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर सेमोडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 

पुलावरुन वळण घेत असताना चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 50 प्रवासी होते. यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच, दरी खोल असल्याने या प्रवाशांना बाहेर काढणेही कठिण ठरतंय. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच. दरीत पाणी असल्याने बचावकार्य करण्यासही अडथळा येत आहे.

अपघातानंतर स्थानिक व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. स्थानिक रहिवाशांना जखमींना मदत करत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तसंच, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत अपघाताची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. अपघातस्थळी पोलिस अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाट परिसरातील वळण रस्त्यावर हा अपघात घडला आहे. येथील वळणे धोकादायक असून चालकाने वाहनं चालवताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसंच, प्रवाशांसाठी योग्य सूचना फलक आणि रस्त्याची देखभाल आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. 

अमरावतीत पावसाचा हाहाकार

अमरावती जिल्हासह विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत विजेच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसाने सोयाबीन पावसात भिजले आहे सोयाबीन आता कापणीला येणार आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे