त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Updated: Nov 4, 2020, 04:52 PM IST
त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार  title=
Pic Courtesy : twitter @Rohitpawar

पुणे : भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही. भाजप सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले गेले. त्यावेळी भाजपला 'आणीबाणी' आठवली नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. 

फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले - सचिन सावंत 

सरकारविरोधात लिहिले, बोलले म्हणून  द वायर, एनडीटीव्ही, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते आहे, असा थेट सवाल भाजपला रोहित पवार यांनी विचारला आहे.

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही कारावाई म्हणजे 'आणीबाणी' आणि पत्रकारितेविरोधात आहे, असे म्हटले होते. याला रोहित पवार यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाचे कोट्यवधी रुपयांचे बिल येणे बाकी होते. अर्णब गोस्वामी यांच्याकडून दरम्यान अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने ऑगस्ट महिन्यात एका व्हिडिओद्वारे अर्णब गोस्वामीविरोधात तक्रार केली होती. 

दरम्यान, रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. २०१८ ला ही केस बंद करण्यात आली. त्यानंतर नाईक कुटुंबीयांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तपास पुन्हा सुरु करण्यात आला आहे.