बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या; पाटबंधारे-महावितरण आणि पोलिसांवर केले गंभीर आरोप

Baramati Suicide: पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग, आणि पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, बारामतीत हा प्रकार घडला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 15, 2024, 03:49 PM IST
बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या; पाटबंधारे-महावितरण आणि पोलिसांवर केले गंभीर आरोप title=
Baramati Late Village Farmer Suicide Due To Harassed Police and government

Baramati Farmer Suicide: बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ काढून कारण सांगितले आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हनुमंत सणस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या शेतामध्ये परिसरातील काही शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले होते. त्या शेतकऱ्यांना सणस यांनी  ते काढायला सांगितले. 

सणस यांना शेत मोकळे करायचे होते. त्यासाठी हनुमंत सणस  आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना काही शेतकऱ्यांनी सणस यांना दमदाटी केली. तसंच, खोट्या केसेस करु, अशी धमकी देखील काही लोकांनी दिली.  त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत  सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. पोलिसांचे सतत येणारे फोन आणि दबाव याला घाबरुन हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप त्यांचे भाऊ जयंवत सणस यांनी केला आहे. 

हनुमंत सणस यांनी 26 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांसह संबंधित कार्यालयांना निवेदन पाठवले होते. या निवेदनात त्यांनी महावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, जलसंपदा विभागाची वडगाव निंबाळकर शाखा तसेच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. 15 मार्चच्या आत मला न्याय द्यावा अशी मागणी सणस यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना केली होती. 

निवेदनातच सणस यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. मी माझे जीवन संपवणार असून याला हावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, वडगाव निंबाळकर जलसंपदा विभाग व वडगाव पोलिस ठाणे तसेच बेकायदेशीररित्या पाणी उचल करणारे लोक जबाबदार असतील, असंही नमूद करण्यात आले होते. 

सणस यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे बंधू जयवंत सणस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार,सहा जणांविरोधात शिवीगाळ, दमदाटी करत मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.