भाजपनं नालायकपणा सुरु केलाय, नेमकं काय म्हणाले संजय राऊत

मुलुंडचा दलाल सांगतो अटक होणार... आणि ईडीची लोकं घरी पोहोचतात  

Updated: Feb 15, 2022, 06:33 PM IST
भाजपनं नालायकपणा सुरु केलाय, नेमकं काय म्हणाले संजय राऊत  title=

मुंबई : भाजप नेत्यांची त्या नेत्यांना नकार दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच माझ्यावर, माझ्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. धाड पडण्याआधी मुलुंडचा जो दलाल आहे, तो पत्रकार परिषद घेऊन सांगतो संजय राऊत यांना अटक होणार आहे. आता ईडीची लोकं या या माणसाच्या घरी पोहचणार आहे, हा काय प्रकार आहे?

तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही याचा सूड अशा प्रकारे, केंद्रीय तपास यंत्रणांचा, सीबीआयचा, ईडीचा गैरवापर करुन आम्हाला त्रास देता, तुम्हाला असं वाटतं आम्ही झुकु, बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही, गुडघे टेकायला. अजिबात नाही. हे शक्य नाही, तुम्ही काही करा, हे सरकार पडणार नाही आणि हे ज्या ज्या दिवशी मी त्यांना सांगितलं, त्या त्या दिवशी माझ्या घरच्यांच्या नातेवाईकांच्या घरी रेड पडल्या.

जे आरोप माझ्यावर झालेले आहेत, त्यातले एकही प्रकरण खरं नाही, कोणत्याही प्रकरणात, मुळात मराठी माणसाने धंदा करु नये असं यांना वाटतं, म्हणून ते आपल्याला टार्गेट करतायत, प्रत्येकाला बदनाम करायचं, खोट्या नावाने फोन करायचा, मुलांना फोन करायचा, ईडी तुमच्या घरी पोहचतंय, उद्या सकाळी तुमच्या वडिलांना अटक करतील. 

इतकं निर्घृण राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाने नालायकपणा सुरु केलाय महाराष्ट्रात, गेल्या वर्षभरापासून आपण पाहतोय शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले सुरु आहेत.

आतापर्यंत शिवसेनेकडून उत्तर दिलं नव्हतं, आता उद्धवजींनी मला सांगितलं आहे, आधी लोकांसमोर सत्य परिस्थिती येऊद्या, आणि मग आपण बघू काय करायचं ते.