भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार?

Maharashtra politics :  रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जागावाटपावरून भाजपमध्ये बंडखोरी आणि महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेला झुकतं माप मिळणार असून भाजपला  8 पैकी फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय.. 

वनिता कांबळे | Updated: Oct 9, 2024, 11:06 PM IST
भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार? title=

Nilesh N Rane : निलेश राणे शिवसेनेतून लढतील का या प्रश्नावर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण थेट निघूनच गेले.. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांचं हे उत्तर... कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची नेमकी स्थिती काय असणार? भाजपचे नेते निलेश राणे आगामी निवडणूक शिवसेनेतून लढणार का? या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या दोन प्रमुख नेत्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप नमतं घेण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही जिल्ह्यातील 8 पैकी फक्त 1 जागा अर्थात विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या रूपाने भाजप लढवणार आहे. तर 6 जागा शिंदेंची शिवसेना, तर एक जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. 

अर्थात रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांनी एकत्रित दिलेलं उत्तर आणि थोड्याच वेळात उदय सामंत यांच्याकडून आलेलं उत्तर पाहता कोकणातल्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला गोंधळ लक्षात आणून देते. गुहागर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ या जागांची भाजपकडून मागणी करण्यात आली होती.

गुहागरमधून माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरीमधून माजी आमदार बाळ माने, राजापूरमधून विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव इच्छूक आहेत... तर कुडाळमधून माजी खासदार निलेश राणे, सावंतवाडीतून माजी आमदार राजन तेली इच्छुक आहेत. 

मात्र, भाजपला दोन्ही जिल्ह्यांमध्ये केवळ एकच जागा मिळणार आहे. त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. तेव्हा विधानसभा निवडणुकीत भाजप आपल्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवून लोकसभेत केलेला कोकणातला करिष्मा पुन्हा राखणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.