मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

राजकीय वर्तुळात अनेक चर्चा 

Updated: Feb 22, 2020, 10:21 AM IST
मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर तिखट प्रतिक्रिया दिली असून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपाटली आहे.  

दोन्ही भाऊ भांडून जरी वेगवेगळे राहत असले तरी नातं काही संपत नाही,  उद्धव ठाकरे हे आता स्वतः निर्णय घेण्याचं धाडस करतायत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मारलाय. 

पंतप्रधान यांची भेट घेण्यात काहीच गैर नाही. पण सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांबरोबरच सोनियांचीही भेट घेतली, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय.

'सरकारवर परिणाम नाही'

मतभिन्नता भावा भावांमध्ये सुद्धा असते. शेवटी ते दूर करतात आणि एकत्र येतात, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. शिवसेनेनं सीएएला पाठिंबा दिला असला तरी सरकारवर त्याचा काही परिणाम होणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींबरोबर सव्वा तास, सोनियांबरोबर चाळीस ते पन्नास मिनिटं, अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास तर लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर काही मिनिटं उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. 

राज्यात CAA आणि NPR लागू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 

केंद्रात आणि राज्यात मतभेद नसल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र हितासाठीच्या निर्णयांसाठी केंद्र मदत करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.