आंबेनळी घाट बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

 आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बस अपघातप्रकरणी सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Jan 5, 2019, 10:22 PM IST
आंबेनळी घाट बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल title=

मुंबई : आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बस अपघातप्रकरणी सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बस अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालक प्रशांत भांबेड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. दापोली ते महाबळेश्वर अशी बस तो घेऊन जात होता. प्रशांत भांबेड यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

28 जुलै 2018 रोजी पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला मोठा अपघात झाला होता. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव सुदैवाने बचावले होते. या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच ठार झाले होते. या अपघातून बचावले प्रकाश सावंत देसाई अपघातानंतर दरीतून रस्त्यावर येत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. त्यानंतर मदत कार्यासाठी प्रयत्न सुरु झालेत.

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळली. या सहलीसाठी त्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. खेड येथे नास्ता केल्यानंतर पुढील प्रवासासाठी बस निघाली. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली.