मुख्यमंत्र्यांनी सांगितले शिवसेनेच्या मेळाव्यात येण्यामागचे कारण

शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. 

Updated: Jun 19, 2019, 08:24 PM IST
मुख्यमंत्र्यांनी सांगितले शिवसेनेच्या मेळाव्यात येण्यामागचे कारण  title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण आणि शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी मी इथे आलो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच शिवसेनेचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंचावर स्वागत केले. तसेच शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. वाघ आणि सिंहाची जोडी एकत्र आल्यावर विजय निश्चित होता. म्हणूनच महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला.

शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते हे या विजयाचे शिल्पकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी आता वाटचाल करायची असल्याचे ते म्हणाले. 
या महाराष्ट्राच्या इतिहासात घडले नाही असा प्रचंड विजय आपल्याला मिळावायचा आहे. झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांसाठी काम करा असे सांगावे लागले नाही. कारण ही युती नैसर्गिक युती आहे असेही ते म्हणाले. एखाद्या पक्षाच्या वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यास बोलावण्याची आपल्याकडे परंपरा नाही. पण 53 व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या इतिहासाचा भाग होण्याची संधी दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.